सांगोला – इतिहासात आपण वाचले आहे की, काही लोकांना छत्रपती शिवरायांच्यानंतर संताजी आणि धनाजी पाण्यात दिसत असत. आज तशाच प्रकारची चिंता आमच्याबद्दल वाटते. त्यामुळेच अशी विधाने आमच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असतात, असा टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लगावला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगोला येथे सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
शरद पवार म्हणाले, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बद्दलची आस्था या सरकारला राहिलेली नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ज्या ज्या वेळेला मी चर्चेला जातो, त्यावेळी कृषीमंत्र्यांकडून मला एकच उत्तर मिळते. तुमच्या आणि आमच्या दृष्टिकोनात फरक आहे. मी विचारले काय? त्यावेळी ते म्हणाले की, तुम्ही जो पिकवतो त्याचाच विचार करता.
पण आम्ही जो खातो त्याचाही विचार करतो. खाणाऱ्याचा विचार केला पाहिजे. त्याच्यात काही वाद नाही. पण पिकवलेच नाही आणि पिकवणारा जगला नाही, तर खाणारा काय खाणार? आणि मग खाणाऱ्यांची गरज भागवायची असेल, तर पहिले शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
तसेच चंद्रकांत पाटील यांच्यापुस्तकातील संदर्भ देत शरद पवार म्हणाले, कालच मी एक पुस्तक वाचले. त्या पुस्तकात लिहिलेले आहे की, मोदी सरकारने महाराष्ट्रातील शंभर साखर कारखान्यांवरील एक्साइज ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेतला. शरद पवार दहा वर्षे त्या खात्याचे मंत्री होते.
त्यांना हा निर्णय घेता आला नाही. तो आम्ही घेतला. खरी गोष्ट आहे. पण माझ्यापुढे प्रश्न होता की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचे की साखर कारखान्यांवरील. त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायचा निर्णय घेतला, असा टोलाही त्यांनी लगाविला.