पारंपरिक शेतीच्या जोडीला शासनाच्या फळबाग लागवड योजनेस गती देण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी दर्जेदार केशर आंबा, हापूस आंबा रोपांची निर्मिती त्रिमूर्ती रोपवाटिकेने केली. तसेच शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यास प्रवृत्त करत जिल्ह्यातील अतित येथील बाळासाहेब माधवराव चव्हाण यांनी दर्जेदार क्वालिटीची केशर आंबा रोपे आपल्या रोपवाटिकेत विकसित केली आहेत.
बाळासाहेब चव्हाण यांनी पदवी घेतल्यानंतर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेती करण्यास सुरुवात केली. कुटुंबाची सुमारे आठ एकर जमीन आहे.
बहुतोशी शेती डोंगरालगत असल्याने पाण्याचा अभाव होता. सन 1993 मध्ये पुनर्वसित जांभगाव येथे एक हेक्टरवर शासनाच्या कृषी विभागाच्या योजनेतून आंबा लागवड करण्याचे नियोजन केले. त्यात केशर आंब्याची लागवड केली. त्या काळात आंबा जास्त उत्पादन घेणारे फळपीक म्हणून कोणी फारसे पाहत नव्हते. तरीही चव्हाण यांनी धाडस केले. यामध्ये अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर फळबाग चांगल्याप्रकारे यशस्वी करुन यामधून चांगले उत्पन्न मिळते हे दाखवून दिले.
यापुढे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत शासनाच्या योजनेचा प्रसार व प्रचार व्हावा व आपल्याला जो शासकीय योजनेचा लाभा झाला त्याचा इतरांनाही लाभ मिळवता यावा, या उदात्त भावनेतून त्यांनी त्रिमूर्ती रोपवाटिका सुरु केली. यामध्ये चांगल्या प्रतिची आंबा रोपे तयार करुन लोकांना याचा फायदा व्हावा म्हणून त्यांना केशर व हापूस या जातीची रोपे विकसित केली.
शासनाच्या कृषी विभागाकडूनही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्यानेच या रोपवाटिका व्यवसायात यशस्वी झाल्याचे चव्हाण आवर्जून सांगतात. आजमितीला त्यांच्या रोपवाटिकेमधील रोपांना जिल्ह्याबरोबरच बाहेरुनही मागणी आहे. रोपे योग्य किंमतीत (शासन अनुदान दरात) मिळत असल्याने त्यांच्या रोपांना मागणी आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.