आळंदी – पुणे ते आळंदी या मार्गावर पीएमपी (पुणे महानगर परिवहन महामंडळ)ला सर्वाधिक नफा मिळवून देतो तरी आळंदीतील पीएमपीचे बसस्थानक अनेक समस्यांच्या गर्तेत असूनही ना पीएमपीएल प्रशासनास याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याने आळंदी पीएमपी स्थानकात प्रवासी “उघड्या’वर म्हणण्याचे वेळ आली आहे.
आळंदीत तसे पाहिले तर एसटी महामंडळाच्या बसेस नावालाच येतात, त्यामुळे भाविकांना पुण्यात उतरुन एक तर पीएमपीने किंवा खासगी वाहनाद्वारेच आळंदीत यावे लागते. त्यातच पुण्याच्या मुख्य ठिकाणांहून पीएमपीच्या बसेस आळंदीत सोडल्या जातात, त्यामुळे भाविक पीएमपीलाच पसंती देतात.
मात्र, आळंदीतील पीएमपी स्थानकात शौचालयाचा अभाव असल्याने भाविकांसह पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यात महिलांचे स्वच्छतागृहाला टाळे असल्याने महिलांची मोठी कुंचबणा होते, तर पुरुषांच्या स्वच्छतागृहात अस्वच्छतेचे साम्रज्य असूनही नाईलाजास्तव या शौचालयाचा वापर करीत आहेत.
याबाबत पीएमपी स्थानकाच्या अधिकाऱ्यांसह अनेकांनी शौचालया विषयी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करुन देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने प्रशासन झोपले आहे का? की केवळ “गल्ला’ जमवण्यात मग्न आहे का, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
आळंदी ते चाकण सेवा करण्यास मुहूर्त नाही
तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून नियमित लाखो भाविक ये जा करीत असतात. त्याचबरोबर आळंदी व परिसरातील वाढते औद्योगिकरण त्यामुळे झालेला मोठा विस्तार त्यासाठी पीएमपीएलच्या बसेस सर्वत्र सोडल्या जात आहेत; मात्र आळंदीपासून अवघ्या 12 किलोमीटरवर असणाऱ्या औद्योगिक पंढरी समजल्या जाणाऱ्या चाकण नगरीत जाण्यासाठी सेवाच नसल्याची खेदजनक बाब म्हणावी लागेल. आळंदी ते चाकण अशी बससेवा 2008 मध्ये बंद करण्यात आली असून ती सुरू करण्यास प्रशासनास मुहूर्तच मिळाला नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानकाबाहेरच रिक्षावाल्यांकडून नियमांची पायमल्ली
आळंदी पीएमपी बसस्थानकाच्या आवाराबाहेर म्हणजे जिथून बसेस बाहेर पडतात त्या ठिकाणी रिक्षावाल्यांनी अतिक्रमण करून स्थानकातील प्रवासी पळून नेण्याचा सपाटा लावला आहे. या हे रिक्षावाले बसेस बाहेर पडतात त्या ठिकाणी रिक्षा उभ्या करून बसला अडथळा निर्माण करतात. तसेच या रिक्षा बसस्थानकापासून नियमानुसार 100 मीटर दूर उभे राहण्याचा नियम सर्रासपणे पायदळी तुडवला जातो, तरीही आळंदी व दिघी पोलीस ठाण्याचे वाहतूक विभाग कारवाई का करीत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.