पवनानगर(वार्ताहर) -जवन-मोरवे रोडवर शिळींब-बोडशेळ घाटात अपघाताचा धोका वाढला आहे. ह्या रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. परंतु अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात राहिलेला रस्तादेखील वाहून जाण्याची भीती नागरिकांमध्ये, वाहनचालक व पादचाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात दळणवळण ठप्प होण्याची शक्यता आहे.
पवन मावळातील नागरिकांसाठी पवनानगर बाजारपेठेला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. जवन-मोरवे रोडवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता उखाडला आहे. अधीचा डांबरी रस्ता रस्ता राहिला नाही. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. नवीन रस्ता करण्यासाठी जवन मोरवे रस्ता उखडण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. शिळींब घाटात हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्ता अरुंद झाल्याने या मार्गावरून प्रवास वाहनचालक व प्रवासी यांना मोठी कसरत करावी लागत आहे. नियोजनशून्य कारभारामुळे याठिकाणी छोटे-मोठे अपघात होतात. याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. परंतु हा रस्ता लवकरात लवकर करावा, अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोणते, शिळींबचे माजी सरपंच संभाजी शिंदे, तुंगचे माजी सरपंच संदीप पाठारे, उपसरपंच शांताराम पाठारे, मोरवेचे सरपंच संजय कोकरे आणि नागरिक व वाहनचालक करत आहेत.
नागरिकांच्या आरोग्याला धोका
या रस्त्यावरून विद्यार्थी, कामगार, दूध व्यावसायिक, पर्यटक दळणवळण करत आहेत. परंतु रस्ता व्यवस्थित नसल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याने ये-जा करताना मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये वाहने अपटून नागरिकांना कमरेचा त्रास सहन करावा लागत. बऱ्याचदा अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड
वाहनचालक अशा खडतर रस्त्याने प्रवास करत असताना त्यांना आरोग्याबरोबरच वाहनाचेदेखील नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. खडेचुकवत वाहन चालवताना गाड्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच इंधनदेखील जास्त लागत आहे. प्रशासन काम वेगाने करत नसल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाविषयी व प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये नाराजी आहे.
पूल झाला अन् रस्ता गेला
मावळच्या शेवटच्या टोकावरील आसपासच्या दहा ते बारा गावांतील नागरिकांना दळणवळणाचा हा मुख्य रस्ता आहे. रस्त्याच्या अर्धवट कामामुळे ऐन पावसाळ्यात वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून शिळींब पुलाच्या कामाचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु पुलाचा प्रश्न सुटला आहे पण नागरिकांवर आता अशी म्हणण्याची वेळ आली आहे की, पूल झाला अन् रस्ता गेला. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. या रस्त्यावरून शिळींब, बोडशेळ, डोंगरवाडी, चावसर, मोरवे, तुंग, कोळे, चाफेसर आदी गावांतील नागरिकांचे दळणवळण अवलंबून आहे.