कराड – शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यातच वेळीअवेळी बंद असणारे सिग्नल या वाहतूक कोंडीत आणखी भर घालत आहेत. त्यामुळे वाहनधारकही या बंद असलेल्या सिग्नलमुळे वैतागले आहेत. शहरातील सर्व सिग्नल सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीला लगाम लागावा, यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठ्या चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. परिणामी शहरात वाहतूक कोंडी होत असली तरी, काही प्रमाणात सिग्नलमुळे शिस्त लागत आहे. मात्र कृष्णा नाक्यावर बसवलेल्या सिग्नलला काही दिवसांपासून ग्रहण लागले आहे. हा सिग्नल कधी चालू तर कधी बंद पडतो. सिग्नल बंद पडल्यावर येथे मोठी वाहतूक कोंडी होते.
कराड शहरातून बाहेर पडण्यासाठी कोल्हापूर नाक्यासह कृष्णा नाका हे प्रमुख रस्ते आहेत. शहरातून उत्तरेच्या बाजूला जाण्यासाठी कृष्णा नाका येथे मोठे सर्कल आहे. तेथून उत्तरेकडे शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्टेशनसह महत्वाची गावे आहेत. परगावाहून येणारी वाहने या चौकात येतात आणि तेथूनच पुढे नवीन कृष्णा पुलावरून त्या-त्या ठिकाणी जातात. त्यामुळे या चौकात वाहतुकीचा अधिकचा ताण पडत असतो.
येथे सिग्नल बसवल्याने वाहतुकीला शिस्त लागली आहे. मात्र काही दिवसांपासून हा सिग्नल वेळीअवेळी बंद चालू होत असल्याने येथे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. येथे वाहनांच्या लांबचलांब रांगा पहावयास मिळत आहेत. याचा सर्वात जास्त फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे येथील सिग्नलयंत्रणा व्यवस्थित चालू करण्याची मागणी शहरवासियांसह प्रवाशांची आहे. सिग्नल व्यवस्थित चालल्यास सध्या होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतुकीला शिस्त लागेल.