नगर – शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांचा सुळसुळाट झाला आहे. या रिक्षांच्या चालकांकडून वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे पालन होत नाही. रस्त्यात कोठेही रिक्षा उभ्या करणे, रस्त्याच्या मध्ये उभे राहून प्रवासी बसवणे, वाहन चालकांशी अरेरावी, असे प्रकार सातत्याने होत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
शहरातील दिल्लीगेट, पाइपलाइन रोड, मनमाड रोड, केडगाव, भिंगार, टिळक रोड या भागातून या रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. माळीवाडा बसस्थानक परिसरात या रिक्षा उभ्या असतात. येथूनच प्रवासी घेऊन शहराच्या विविध भागात रिक्षा जातात. या रिक्षा मात्र वाहतुकीचे कोणतेही नियम पाळत नाहीत. माळीवाडा बसस्थानकाबाहेरील परिसर तर पूर्णपणे बंदिस्त झाला आहे.
येथून रस्ता शोधणे कठीण झाले आहे. याचे कारण म्हणजे रस्त्याच्या कडेला अतिक्रमणे असल्याने रस्ता आधीच अरुंद झाला आहे. त्यात पुन्हा या रिक्षा येथे उभ्या राहत असल्याने वाहनांना जाण्या-येण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही. येथून कसेबसे बाहेर पडल्यानंतर पुढील चौकात या रिक्षा रस्ता अडवून उभ्या असतात. या चौकात शहरातून येणाऱ्या वाहनांची गर्दी झालेली असते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडीच्या समस्येची डोकेदुखी झाली आहे. यापुढे गेल्यानंतर मध्ये उतरणारे प्रवासी असतात. त्यामुळे या रिक्षा रस्त्याच्या कडेला थांबत असल्या तरी वाहतुकीस अडथळा होतो.
दिल्ली गेट भागात तर या रिक्षांचा त्रास प्रचंड वाढला आहे. या भागात अन्य वाहनांची वर्दळ जास्त असते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्येने नागरिक त्रस्त झाले आहे. येथेही रिक्षा रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असतात. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा विचार केला जात नसल्याने वाहतूक कोंडी होते. पुढे मनमाड रोडवरील सिव्हिल हॉस्पिटलसमोर अशाच पद्धतीने रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जाण्यास अडचणी निर्माण होतात. वाहनांच्या गराड्यातून त्यांना हॉस्पिटलध्ये जावे लागते. शहरातील प्रेमदान चौक, लालटाकी, सावेडी नाका, प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक या ठिकाणीही अशीच स्थिती आहे. या रिक्षांसाठी कोणताही थांबा नाही. त्यामुळे शहराअंतर्गत वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे.
सिग्नल असला तरी फरक काय?
<शहरात बऱ्याच ठिकाणी सिग्नल बंद आहेत. त्यामुळे येथे वाहने थांबत नाहीत. ज्या चौकात सिग्नल सुरू आहेत तेथे मात्र, सिग्नलचे नियम पाळण्यास वाहनचालकांना वेळ नाही. लाल सिग्नल सुरू असताना किंवा हिरवा सिग्नल सुरू होण्यास काही सेकंद बाकी असताना वाहने काढून घेण्यासाठी धावपळ सुरू असते. यामध्ये चारचाकी, दुचाकी व रिक्षा या सर्वच प्रकारची वाहने असतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याने या ठिकाणी किरकोळ अपघात सातत्याने होत आहेत.