1. महाराष्ट्रांतील सत्तांतराचा पेच आता घटनापीठापुढे
25 ऑगस्ट रोजी होणार पहिली सुनावणी
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या संबंधातील पेच आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आला आहे. येत्या 48 तासांतच घटनापीठाची स्थापना होऊन या प्रकरणातील पहिली सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर शिंदे गटाच्या दोन मागण्या अमान्य करण्यात आल्या आहेत. शिवसेनेने अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांच्या संबंधात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभेच्या विद्यमान अध्यक्षांना घेऊ द्यावा आणि पक्षाच्या चिन्हाच्या विषयावर निवडणूक आयोगाकडे निर्णय घेण्याचा अधिकार द्यावा अशा दोन मुख्य मागण्या एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आल्या होत्या. परंतु या दोन्ही मागण्या आज सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केल्या आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढेच याचा सोक्षमोक्ष लागेल.
2. धक्कादायक! विधानभवनासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन असतानाच विधानभवानाबाहेर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी विधीमंडळ परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली त्यामुळे अनर्थ टळला. तसेच देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतीच्या वादातून हा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे.
3. दगाफटका, गद्दारी, पाठीत खंजीर खुपसून मी बाहेर पडलो नाही – राज ठाकरे
आपल्या बंडाची तुलना राणे, भुजबळ, शिंदे यांनी केलेल्या बंडाशी करू नका असे परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मांडले. मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आपण शिवसेना सोडताना, मातोश्रीवर गेलो तेव्हा बाळासाहेबांनी बोलवलं. अलिंगनासाठी हात पसरले. मला मिठी मारली आणि म्हणाले ‘आता जा’ अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलेलो नाही. कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही.’ असं देखील ठाकरे म्हणाले.
4. दिल्लीतील भाजपचे ऑपरेशन लोटस फेल गेल्याचा दावा
फोन संभाषणाचे पुरावे असल्याचे आप नेत्यांचे म्हणणे
भारतीय जनता पक्षाने दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्यासाठी दुसऱ्यांदा ऑपरेशन लोटस राबवले होते; परंतु ते सपशेल अपयशी ठरल्याचा दावा या पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी भाजपने थेट उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाच फोडण्याचा प्रयत्न केला होता; परंतु सिसोदिया यांनी ठामपणे हा प्रकार मोडून काढला. भाजपने त्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती तसेच त्यांच्या विरोधातील सर्व खटले मागे घेण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले होते. त्या संबंधातील फोन संभाषणाचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
5. राजा सिंह भाजपमधून निलंबित
मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीने त्यांचे तेलंगणातील आमदार राजा सिंह यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यांना या प्रकरणात आज पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर भाजपने ही कारवाई केली असून राजा सिंह यांच्याकडून दहा दिवसांत स्पष्टीकरणही मागितले आहे. राजा सिंह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात त्यांनी पैगंबरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
6. हिंदूंची कोणतीही देवता उच्च जातीतील नाही
हिंदूंची कोणतीही देवता उच्च जातीतील नाही. कृपया आपल्या देवांची उत्पत्ती पाहा, त्यातील कोणीही ब्राह्मण नाही असे वक्तव्य जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अर्थात जेएनयूच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयातर्फे आयोजित डॉ. बी. आर. आंबेडकर व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. पंडित म्हणाल्या, सगळ्यात वरच्या स्तरावर क्षत्रिय येतात. भगवान शिव स्मशानात सापासोबत बसतात. त्यामुळे ते अनुसूचित जाती-जमातीमधील असावेत. ब्राह्मण स्मशानात बसू शकतील असे मला वाटत नाही. मग आपण सगळे हा अत्यंत अमानवीय असलेला भेदाभेद का पाळतो? अशी भूमिका जेएनयूच्या कुलगुरूंनी मांडली.
7. भाजप नेत्या अभिनेत्री सोनाली फोगट यांचे निधन
हरियाणातील भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 42 वर्षांच्या होत्या. त्या माजी टिक टॉक स्टार होत्या तसेच त्यांनी “बिग बॉस” या रिऍलिटी शोमध्ये देखील भाग घेतला होता. त्या त्यांच्या काही स्टाफ सदस्यांसह गोव्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. सोमवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी रुग्णालयात आणण्यात आले.
8. बॉलीवुड सध्या वाईट काळातून जातेय
मात्र हिंदी चित्रपटसृष्टी कधीच संपणार नाही
गेल्या काही काळापासून हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांचा अगदी थंड प्रतिसाद मिळतो आहे. मोठ्या बजेटचे चित्रपट सुपरफ्लॉप ठरत आहेत. त्यावरून चर्चा सुरू असताना त्यात आता दिग्गज कलाकार मनोज वाजपेयीनेही आपली भूमिका मांडली आहे. कधी कधी आपण अत्यंत प्रतिकूल काळातून जात असतो. मात्र, चित्रपटसृष्टी मरणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टी तर कधीच मरणार नाही, येणाऱ्या काळात तुम्ही हिंदी सिनेमात अनेक नवे चेहरे आणि रोमांचित करणाऱ्या गोष्टी पाहू शकाल असे त्याने म्हटले आहे.
9. भगवद्गीतेमधून आपल्याला उर्जा मिळते – ऋषी सुनक
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी जन्माष्टमीनिमित्त हर्टफोर्डशायरमधील इस्कॉनच्या मंदिराला भेट दिली. ज्या-ज्या वेळी आपल्यावर संकटे येतात त्या-त्या वेळी भगवद्गीतेमधून आपल्याला उर्जा मिळत असल्याचे ऋषी सुनक यांनी सांगितले आहे. ऋषी सुनक यांनी खासदारपदाची शपथ ही गीतेवर हात ठेऊन घेतली होती. तसेच ते दर रविवारी मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जातात. ऋषी सुनक यांनी हर्टफोर्डशायरमधील इस्कॉनच्या मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती होत्या. यावेळी त्यांनी गोमातेचे पूजन केले.
10. आशिया करंडकापूर्वी भारतीय संघाला धक्का
मुख्य प्रशिक्षक द्रविड यांना करोनाची बाधा
भारतीय संघाच्या आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याच्या मोहिमेला धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून आता त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण यांना संघासह दुबईला पाठवण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. जे खेळाडू झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रवाना झाले होते त्यांच्या व्यतरीक्त जे खेळाडू आशिया स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत, त्यांच्यासह द्रविड व सपोर्ट स्टाफमधील व्यक्तींची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्याच्या अहवालात द्रविड यांना बाधा झाल्याचे समोर आले आहे.