टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगट सुवर्णयश मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतात करोनाचा धोका अद्याप संपलेला नसल्याने तिने परदेशात प्रशिक्षण तसेच सराव करण्याचे ठरवले होते. त्याबाबत तिने केंद्रीय क्रीडामंत्रालय व भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे रितसर परवानगीही मागितली होती. अखेर ती परवानगी तिला मिळाली व तिचा परदेशातील सरावाचा प्रश्न सुटला. एक गोष्ट यात नोंदवावीशी वाटते की, जर एखाद्या खेळाडूकडून आपल्याला ऑलिम्पिक पदकाची खात्री असेल तर तिला वारंवार विनंती का करावी लागते. क्रीडा प्राधिकरण काय किंवा क्रीडा मंत्रालय काय त्यांनी जर विनेशचा समावेश टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम (टॉप) या योजनेत केला आहे तर तिला आवश्यक त्या सर्व सुविधा देखील उपलब्ध करून द्यायला हव्यात.
जर तोकड्या सुविधा असतील तर खेळाडूंकडून पदकाची खात्री कशी करता येईल. भारतीय क्रीडा क्षेत्राची हीच खरी शोकांतिका आहे. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जाते व वशिल्याचे घोडे शर्यतीत पळवले जातात. तसे पाहिले तर गेल्या दीड दशकांपासून आपल्याला ऑलिम्पिक पदकांची खात्री येऊ लागली आहे. 2004 साली अथेन्स ऑलिम्पिकमध्ये डबलट्रॅप नेमबाजीत राजवर्धन राठोडने पदक पटकावले व भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्येही पदके जिंकू शकतात हा विश्वास दिला. त्यानंतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये आपण पदके मिळवत आहोत. मात्र, तरीही ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या खेळाडूंबाबत आपण गांभीर्य दाखवत नाही, याचे आश्चर्य वाटते.
विनेशला तिच्या वुलर अकोस या प्रशिक्षकांसह आणि सहकारी प्रियांका फोगट व फिजिओ पूर्णिमा रामन यांच्यासह हंगेरी आणि पोलंडमधील 40 दिवसांच्या प्रशिक्षणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, हे देखील नसे थोडके. टॉप योजनेंतर्गत या प्रशिक्षण व सराव शिबिराला मान्यता देण्यात आली आहे. हंगेरीतील बुडापेस्ट येथे विनेशचा हा सराव व प्रशिक्षण 24 जानेवारीपर्यंत चालणार आहे. तसेच पोलंड येथील ऑलिम्पिक सराव 5 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. विमानखर्च, वाहतूक, राहणे-खाणे तसेच भत्ता म्हणून एकूण 15.51 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
2014 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्णयश मिळवले होते. तसेच त्याच वर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने ब्रॉंझपदकाची कमाई केली होती. 2016 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही तिने देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यावेळी तिला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे माघार घ्यावी लागली होती. तिला 2016 साली अर्जुन पुरस्कारही मिळाला. त्यानंतर 2018 साली पद्मश्री पुरस्कारसाठीही तिची शिफारस करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी तिला हा पुरस्कार मिळाला नाही. त्यानंतर यंदाच्या वर्षी तिला देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च मानला जाणारा खेलरत्न पुरस्कारही मिळाला आहे.
या गौरवानंतर तिच्यावरील जबाबदारी वाढली असून त्यासाठीच तिने दुखापतीतून सावरल्यानंतर लगेचच सरावाला प्रारंभही केला होता. त्याचवेळी जगभरात करोनाचा धोका वाढला आणि सर्व स्पर्धा ठप्प झाल्या आणि सरावही थांबला. आता यातून सावरत असताना देशातच अद्ययावत सुविधा असत्या तर तिला परदेशात सरावासाठी जाण्याची गरज पडली नसती. हरियाणातील बलाली गावात जन्मलेली विनेश आज केवळ 26 वर्षांची असून येथील प्रसिद्ध भवानी क्रीडा संकुलात ओ. पी. यादव यांच्याकडे प्रशिक्षण घेते. त्याचबरोबर प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक वुलर अकोस यांच्याकडून ती अत्याधुनिक प्रशिक्षणही घेत आहे.
48 किलो फ्री-स्टाइल गटात खेळणारी विनेश हंगेरी व पोलंड येथील सरावाबाबत प्रचंड आशावादी आहे. तिने राष्ट्रकुल स्पर्धेतून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता व त्याच स्पर्धेत तिने 2014 व 2018 साली पदकेही मिळवली आहेत. 2014 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत तिला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले होते. त्याची भरपाई तिने दोन वर्षांपूर्वी जकार्तामध्ये याच स्तरावरील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत पूर्ण केली. 2013, 2015 व 2016 या तीनही वर्षी तिने आशियाई विजेतेपद कुस्ती स्पर्धेतही पदके मिळवली. मूळ 48 किलो वजनी गट असूनही तिने अनेकदा 51 आणि 53 किलो गटातही सहभागी होत पदके प्राप्त केली आहेत.
घरात क्रीडा संस्कृती असल्यामुळे तिच्या खेळाला पूर्ण पाठिंबाही मिळत आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी विनेश भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली आहे. गेल्या वर्षी लावरस क्रीडा पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटूही ठरली होती. तिने बालपणीचा मित्र सोमवीर राठी या कुस्तीपटूशी विवाह केला. त्यानंतरही तिने आपल्या खेळाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.
गेल्या वर्षीच तिने आपल्या कामगिरीने आगामी ऑलिम्पिक पदकाचा विश्वास दिला. आशियाई कुस्ती स्पर्धेत ब्रॉंझ, यासर दोगू स्पर्धेत रशियाच्या खेळाडूवर मात करत सुवर्ण, पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत 53 किलो गटात सलग तिसरे सुवर्णपदक पटकावले. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटूही ठरली. याच स्पर्धेच्या क्रमवारीत पहिल्या सहा खेळाडूंमध्ये असल्याने ती टोकियो ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरली.