जे जे लिखित स्वरूपात असते ते म्हणजे साहित्य. भाषा हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामुळे विविध भाषांमध्ये साहित्य निर्माण केले गेले. लेखकाला आलेले अनुभव, त्यांचे विचार साहित्यातून पुढे आले. ते साहित्य वाचले गेले. त्यामुळे समाजात क्रांती घडून आली. आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना वाचालयाच वेळ नाही.घर, नोकरी या व्यापात वेळच कुठे आहे लोकांना.. ? इंटरनेटच्या जाळ्यात सगळं जगच अडकून पडले आहे.
आपण वर्तमानपत्रं, नियतकालिक, विविध कथा, कादंबऱ्या वाचत असतो. वाचनामुळे शब्दसंग्रह वाढतो. नवनवीन शब्द वाचनात येतात. विविध अनुभव अनुभवता येतात. बरेच काही शिकता येते. पण आजची तरुण पिढी वाचनात इतकी गुंग होताना दिसते का? आजच्या डिजिटल युगात सर्वच डिजिटल झाले आहे. वर्तमानपत्रं वाचल्याशिवाय काहींची सकाळच होत नाही.
वर्तमानपत्रामुळे घडलेल्या घडामोडींची माहिती मिळते. पण सगळे जगच ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे ई-पेपर नावाचा प्रकार पुढे आला. इंटरनेटवर आपण कुठलाही पेपर कुठेही ई-पेपरमुळे वाचू शकतो. आजची तरुण पिढी ही जास्त मोबाईलवरच दिसते. त्यामुळे वर्तमानपत्रांची विक्री कमी होतेय. किंडल नावाच्या ऍपमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त पुस्तके समाविष्ट आहेत.
त्यामुळे मूळ पुस्तक हातात घेण्यापेक्षा मुलं ऑनलाइन पुस्तके वाचतात. जड पुस्तके सोबत घेऊन फिरण्याची गरजच उरत नाही. बरेच लोक गुगलवर सर्च करून पुस्तके वाचतात. विविध प्रकाशने नवनवीन पुस्तके प्रकाशित होत असतात. वर्तमानपत्रात पुस्तक परीक्षण प्रसिद्ध केली जातात.
त्यामुळे वाचकांना पुस्तकाची ओळख होते, थोडक्यात सार कळतो. परीक्षण वाचल्यानंतर वाचकांची पुस्तक पूर्ण वाचण्याची उत्कंठा वाढते. बदलत्या जगाची बदलती मागणी पाहून लेखक, कवी आपले ऑनलाइन पुस्तके उपलब्ध करतात. लोक ऑनलाइन पुस्तके विकत घेतात.ऑनलाइन पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या वाढत आहे . त्यामुळे प्रती कोणी विकत घेत नाही. वाचन वाढावं यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. मोफत ग्रंथालये सुरु केली जातात.
वर्तमानपत्र वाचनालय सुरु केली जातात. जेणेकरून जे लोक पैशांच्या अभावी वाचनापासून लांब जातात ते जवळ येतील. वाचक आहे तर लेखकाच्या लेखणीला किंमत आहे. वाचनसंस्कृती जपली पाहिजे. तो वारसा पुढे वाढला पाहिजे. एखाद्याला भेट म्हणून काही द्यायचे असेल तर एखादे पुस्तक भेट द्या.. या पुस्तकामुळे तुम्ही त्या व्यक्तीच्या कायम स्मरणात राहाल.
– अस्मिता प्रदीप येंडे