अजूनही आठवतात मला ते लहानपणीचे दिवस. एप्रिल महिना आला की, आई अन् वहिनींची वर्षभराची कामं चालू व्हायची. उदाहरणार्थ तांदूळ निवडणे, त्याला बोरिक पावडर लावणे, कुरडया करणे वगैरे. तेव्हा मी तांदूळ निवडायला त्यांना मदत करीत असे. त्याकाळी आंबेमोहर तांदुळात बारीक खडे आणि “कोद्रु’ नावाचे बाजरीसारखे दिसणारे एक धान्य अगदी थोड्या प्रमाणात का होईना मिसळलेले असे. तेव्हा आई मला म्हणायची. “खडे नि कोद्रु बाजूला काढ, नीट निवड गं बाई, जेवताना उगीच कुणाला लागायला नको.’ तेव्हापासून कोणतीही गोष्ट नीट निवडून घ्यायची, नको त्या गोष्टी बाहेर टाकून द्यायचे अंगवळणी पडले.
आईचे विचार मनात अगदी घर करून राहिले आणि पुढील जीवनात ते मला खूपच उपयोगी पडले. तेव्हापासून ते आजपर्यंत. किराणा माल, भाजीपाला, कपडेलत्ते, हौसेने घेतलेल्या वस्तू अगदी कोणतीही खरेदी चार-पाच ठिकाणी पाहून, सर्व नीट पारखून आणि त्यातून निवड करून मी खरेदी करत असते.
अगदी हॉटेलमध्ये गेलो तरीही मेनूकार्ड बघणार, त्यानंतर काय मागवायचं त्यावर चर्चा होणार, गरम काय आहे, हे वेटरला विचारणार आणि मगच ऑर्डर देणार. माझ्या या चिकित्सक स्वभावाची काही वेळेला “हे’ चेष्टा करतात. तरीही माझ्याकडून तो काही बदलत नाही. पण आजकालची पिढी मात्र निवडीच्या मागे लागत नाही आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना भासणारा वेळेचा अभाव. त्यांना चांगल्या वस्तू तर पाहिजे असतात, पण वेळ नसतो.
म्हणून ऑनलाईन खरेदीसाठी यादी दिली की काम होते. पण निवड करणे मात्र होत नाही. मग जसे आहे तसे ते स्वीकारणे भाग पडते. मग तो किराणामाल, भाजीपाला, कपडे किंवा अगदी खाण्याचे पदार्थ काहीही असो. नाहीतर डस्टबीन असतेच घरात. त्यावर जास्त विचार न करता ही ऑनलाईनची पिढी पुढे जाते. काळानुसार त्यांचंही बरोबर आहे. मला मात्र माझा मार्ग जसा आहे तसाच आवडेल. आता कधीतरी मुलं म्हणतात- आई कशाला उगीच दगदग करतेस? पण मला ती दगदग न वाटता त्यात मनापासून आनंदच वाटतो.
– रोहिणी महाजन