लेखक, पत्रकार, संपादक तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक-सदस्य दादासाहेब रुपवते यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1925 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या प्रवरा नदीच्या काठी वसलेल्या एका छोट्याशा गावात झाला.
दादासाहेबांना उपजत बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी निसर्गाने दिलेली देणगी होती. त्यांनी आपले व्यक्तिमत्त्व व्यायामाने, तन, मन आणि ज्ञानाने घडविले व गतिमान, प्रगतीशील आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व विकसित केले. मागासवर्गीय समाजाला मिळणाऱ्या वागणुकींचे चटके त्यांनीही सोसले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण अकोले व नाशिक येथे झाले. त्याच सुमारास मागासवर्गीय समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समतेसाठीच्या लढ्यामुळे उत्साह आणि आशावादाची लाट निर्माण झाली होती. या चळवळीत दादासाहेबही सामील झाले. या चळवळीत भाग घेण्यासाठी ते मुंबईला गेले.
मुंबईतच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, कार्याचा बारकाईने अभ्यास केला. बाबासाहेबांशी संवादही होऊ लागला. त्यांची विचार करण्याची पद्धत व कार्य पाहून बाबासाहेबांनी विश्वासाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. आपल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी मोठ्या समर्पकपणाने आणि विश्वासाने पार पाडल्या. मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयातील वसतिगृहाचे पहिले रेक्टर, पीपल्स एज्युकेशन सोसायटीमधील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विद्यार्थी शिष्यवृत्ती समितीचे सचिव आणि “प्रबुद्ध भारत’ या साप्ताहिकाचे संपादक (डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतर) म्हणून त्यांचे काम खूपच प्रभावी झाले. वर्ष 1948 मध्ये बहुजन शिक्षण संघाची स्थापना करून दादासाहेबांनी दलित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी निर्माण केली.
आजही बहुजन शिक्षण संघ अनेक वसतिगृहे, नर्सरी शाळा, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि सांस्कृतिक केंद्रे यशस्वीपणे चालवित आहे. सामाजिक समता परिषद आणि उपेक्षित व्यासपीठ यासारख्या संघटनांच्या पाठिंब्याने दादासाहेबांनी दलित, कामगार आणि भूमिहीन मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळही सुरू केली. ग्रामीण भागातील कवी, स्थानिक नर्तक, कलाकार आणि रसिकांना स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी लढण्यास, संघटित करण्यातही दादासाहेबांचा मोठा वाटा होता. स्थानिक लोककला प्रकारांचे जतन करण्यासाठी त्यांनी आपला पाठिंबा दिला आणि तरुण कलाकारांसाठी ते प्रेरणास्थान बनले.
यशवंतराव चव्हाण यांच्या सल्ल्यानुसार मराठी विश्वकोश निर्मितीच्या कार्यात लक्ष्मणशास्त्री जोशी यांना संपादक म्हणून संकलनास दादासाहेबांनी सहकार्य केले. त्यासाठी ते वाई येथे येऊन राहिले होते. पाली आणि संस्कृतसारख्या प्राचीन भाषांचे सार जतन करून, तत्कालीन राजकीय आणि सामाजिक समस्यांचे विवेचनात्मक विश्लेषण आणि त्याचे दस्तावेजकरण करून त्यांनी आपली बौद्धिक जबाबदारी पार पाडली. बौद्धधर्माच्या प्रसारात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी योगदान दिले. दादासाहेबांनी आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतातील दलित आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व केले.
वर्ष 1968 ते 1978 या दहा वर्षांच्या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 1972 ते 1975 आणि 1977 ते 1978 या कालावधीत दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. त्यावेळी त्यांच्याकडे समाज कल्याण, गृहनिर्माण, सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय, झोपडपट्टी इत्यादी खात्यांचा कार्यभार होता. ते विनोदी पण स्पष्टवक्ते होते. 23 जुलै 1999 रोजी त्यांचे निधन झाले.