नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना कॉंग्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना आवाहन केले आहे. पुढच्या तीन महिन्यांसाठी सर्व कॉंग्रेसजनांनी स्वत:ला पक्षासाठी समर्पित करावे असे आवाहन खर्गे यांनी केले आहे.
पक्षाच्या बैठकीत नेत्यांना संबोधित करताना खर्गे म्हणाले की, आपले मतभेद विसरून काम करावे, अंतर्गत मतभेदाचे मुद्दे माध्यमांमध्ये उपस्थित करू नयेत आणि पक्षाच्या विजयासाठी एक टीम म्हणून काम करावे. आपण जर आता रात्रंदिवस काम केले तर लोकसभा निवडणुकीनंतर एक पर्यायी सरकार देण्यात आपण यशस्वी ठरू.
राहुल गांधी, पक्षाचे सर्व सरचिटणीस, सर्व राज्यांचे प्रभारी आणि बहुतांश प्रदेशाध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते. ज्या ज्या राज्यांत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीशी जोडले गेलेले, मजबूत कार्यकर्त्यांचे आणि विचारधारेचे पाठबळ असलेले पक्ष आहेत त्या त्या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी केवळ नाममात्र शिल्लक राहीली आहे असा दावाही खर्गे यांनी केला.
दरम्यान, २०२४ च्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठीची रणनीती तयार करण्यासाठीच्या या बैठकीत प्रदेश शाखांनी जागावाटपात कॉंग्रेसने जादा जागांची मागणी करावी अशी भूमिका मांडली. तर पंजाब आणि केरळमधील नेत्यांनी तर या दोन राज्यांत कॉंग्रेसने कोणाशीही आघाडीच करू नये अशी भूमिका मांडल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
भाजपवर हल्लाबोल !
आपल्या भाषणात खर्गे यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली. भाजप गेल्या दहा वर्षांतील आपले अपयश झाकण्यासाठी आता भावनिक मुद्दे जोरदारपणे पुढे करते आहे. ते जाणीवपूर्वक या प्रत्येक मुद्द्यात कॉंग्रेस पक्षाला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला सगळ्यांना एकजुट राहून प्रत्यक्षात असलेली स्थिती मांडताना भाजपचा खोटारडेपणा, फसवणूक आणि चुकीच्या बाबींचे सडेतोड उत्तर द्यायचे आहे असे त्यांनी नमूद केले.