श्रीकांत कात्रे
उदयनराजेंविरोधात अखेर श्रीनिवास पाटील यांचेच आव्हान
सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित केले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. ही पोटनिवडणूक चुरशीची तर होणार आहेच; पण “कुणाला तरी विजयी करायचयं आणि कुणाला तरी पाडायचयं,’ या समीकरणामुळे या पोटनिवडणुकीकडे राज्याचेच नव्हे तर साऱ्या देशाचे लक्ष लागून राहणार आहे.
आघाडी आणि युती एकजीव असणार का?
सातारा पोटनिवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित झाले. दोन्ही पक्षांकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न होतीलही. मात्र, या निवडणुकीत आघाडीच्या आणि युतीच्या धर्माचे पालन कसे होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कराड दक्षिण वगळता इतर तालुक्यांमध्ये कॉंग्रेस अस्तित्त्वाला तरी शिल्लक आहे की नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस भक्कम असला तरी कॉंग्रेसची साथ कितपत मिळणार, ही साशंकता आहे. युतीमध्येही तोच प्रश्न आहे.
ही जागा शिवसेनेकडे असताना भाजप पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. विधानसभेचे उमदवार लोकसभेच्या उमेदवाराला मदत करतील, असे मानण्यात येते. मात्र, विधानसभेच्या अनेक जागांच्या वाटपातील नाराजीची छाया या पोटनिवणुकीच्या रिंगणावर असणार आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीचा धर्म कोणाकोणाला उपयोगी पडणार आणि कोणासाठी उपद्रवी ठरणार तेच महत्त्वाचे आहे.