हिंजवडी(प्रतिनिधी) – जागतिक दर्जाच्या हिंजवडी आयटीपार्कच्या कुंपणावर गेली दोन वर्षे बिबट्यांची दहशत पसरली आहे. गेल्या वर्षी नेरे येथील शेतकऱ्याच्या दोन वासरांना बिबट्याने ठार केले, तर कासारसाईत शेळ्या, मेंढ्यांसह पाच कोंबड्या फस्त केल्याची घटना ताजी असताना सोमवारी (दि. 24) सकाळी पुन्हा नेरे येथील उसाच्या फडात बिबट्याच्या मादी जातीचे तीन बछडे आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नेरे गावातील शेतकरी मोहन जाधव यांच्या शेतात ऊस तोडणी करताना विठ्ठल पालवे या कामागराला हे बछडे आढळले. जाधव यांनी तत्काळ माहिती वनविभाला कळविली. त्यानुसार घटनास्थळी पौड, मुळशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, वनपाल मीरा केंद्रे, वनरक्षक पांडुरंग कोपणर यांच्यासह प्राणी मित्र शेखर जांभूळकर, पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश सोरटे, राहुल जाधव, अनिमल रेस्क्यू टीम, चाइल्ड अनिमल ऍण्ड स्नेक प्रोटेक्शन, वन्यजीव रक्षक संघटेनेचे स्वयंसेवक दाखल झाले.
वन अधिकारी व रेस्क्यू टीमने हे बछडे ताब्यात घेतले असून लोकांची गर्दी टाळण्यासाठी वनपरीक्षेत्र कार्यालयात अधिकाऱ्यांच्या देखरेखीत ठेवली आहेत. हे बछडे 15 दिवस ते महिनाभर वयाची असावीत, असा अंदाज वनक्षेत्रपाल चव्हाण यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, या बछड्यांना त्यांच्या आईची व मायेची गरज आहे. त्यामुळे जेथे बछडे सापडले आहेत, त्याच ठिकाणी त्यांना पुन्हा सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे बिबट्या मादी त्या बचड्यांना घेऊन जाईल. त्या मादीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात येणार असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन ही वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण यांनी केले आहे.
हालचालींवर वनविभागाचे लक्ष
संध्याकाळी या पिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी रिस्क्यू टीमने उसाचे पाचट गोळा करून त्यांच्यासाठी उसाच्या फडात निवारा तयार केला होता. ते पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, वन अधिकाऱ्यांनी लोकांची गर्दी कमी करत अंधार पडताच याठिकाणी पुन्हा पिलांना सुरक्षित ठेवले. येथे कॅमेरे तिथे लावण्यात आले असून बिबट्या मादीच्या हालचालींवर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून आहेत
पाळीव कुत्रा गुंड्या देतोय संकेत…
बिबट्याचे तीन बछडे सापडलेल्या मोहन जाधव या शेतकऱ्याच्या शेतात पाण्याची मोटार चालू बंद करण्यासाठी ये-जा करताना त्यांचा गुंड्या नावाचा पाळीव कुत्रा त्यांच्यापुढे पन्नास ते शंभर फूट जाऊन विविध प्रकारचे संकेत देतो. त्यामुळे पुढे काही धोका आहे का? याची चाहूल त्या गुंड्याला आगोदरच लागलेली असते, असे मोहन जाधव, राहुल जाधव व माजी सरपंच विद्या जाधव यांनी सांगितले.