मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पनवेलमध्ये कोकणातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात करण्यात आला होता. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या खास ठाकरी शैलीत सत्ताधारी आणि विरोधकांचा समाचार घेतला. दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावे अशी थेट टीका यावेळी राज ठाकरेंनी भाजपवर केली.
यावेळी राज यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला. जे खोके खोके ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर आहेत कोविड पण त्यांनी सोडला नाही. असा टोला यावेळी राज यांनी उद्धव यांना लगावला. प्रत्येक वेळी यायचं बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला इमोशनल करायचं हेच सुरु आहे असंही राज यावेळी म्हणाले.
मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी आता मनसे आक्रमक झाली आहे. गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आता मनसे मैदानात उतरली आहे. या मेळाव्यात प्रलंबित मुंबई-गोवा महामार्गा संदर्भात आंदोलनाची हाक देण्यात आली. असे आंदोलन करा की, यापुढे रस्ते करताना सरकारला अशाप्रकारे आंदोलन झालं होतं अशी भीती असावी, दहशत असावी” असं आवाहन यावेळी ठाकरेंनी मन सैनिकांना केले.
चंद्रयान ३ वरून निशाणा
“चंद्रयान चंद्रावर जाऊन काय उपयोग, तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता,” असा खोचक टोला राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्ग, तसेच नाशिकमधील रस्त्यांच्या अवस्थेवरुन लगावला आहे.
कोकणातील जमिनी इतरांच्या घश्यात चालल्या आहेत. नाणार प्रकल्प रद्द होतोय म्हटल्यावर लगेच बारसू प्रकल्प आला. इथे कोणी जमिनी घेतल्या, कोणाच्या नावावर पाच हजार एकर जमीन घेतली. आपलीच लोक आहेत.. कुंपण शेत खातंय… आपल्या कोकणी लोकांना फसवून दुसऱ्याच्या घशात घालतात अशी टीका देखील राज ठाकरेंनी यावेळी केली.