पुणे – ज्यांनी ज्यांनी देशाला लुटले आहे, त्यांना आम्ही तुरुंगात धाडल्याशिवाय राहणार नाही. ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. जनतेचा पैसा परत येईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुण्यातील सभेत दिला. जम्मू-काश्मीरमधून 370 अनुच्छेद रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आज संपूर्ण जगात भारताचा डंका वाजतो आहे. एक दबदबा निर्माण झाला आहे, असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुण्यात स. प. महाविद्यालय मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा झाली. मोदींचे सभास्थळी आगमन होताच भाजप कार्यकर्त्यांनी मोबाइल टॉर्च ऑन करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. याप्रसंगी मोदी यांच्या भाषणातील प्रत्येक विषयाला नागरिकांनी उस्त्फूर्त दाद दिली. मोदी यांनी भाषणाची सुरवातच आपल्या खास शैलीत “कस काय पुणेकर’ अस मराठीत संबोधून केली. त्यावेळी नागरिकांनी सुद्धा “छान आहे’ असे म्हणत त्याला दाद दिली. मोदींनी आपल्या भाषणात 370 कलमांचा उल्लेख करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यावेळी पुन्हा मोदी मोदी नावाचा गजर झाला हा गजर ऐकून मोदींनी मध्येच भाषण थांबविले व स्टेजजवळ येऊन अभिवादनाचा स्वीकार केला.
आताचा भारत हा बदलेला भारत आहे. 130 कोटी भारतीय नागरिकांमुळे नव्या भारताचा विश्वास जगाला दिसतो आहे. 21 व्या शतकातला भारत हा निर्भय आहे, तो भयभीत होणारा नाही. सुरक्षा, स्वच्छता आणि वेग या तिन्ही विषयांवर सरकार काम करतं आहे. वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस आम्ही सुरू केल्या. पुण्यात मेट्रो सुरू करतो आहोत, पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करतो आहोत. पुढील 5 वर्षांत पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी रुपये खर्च करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, जनतेला वर्षानुवर्ष लुटणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी देशाला लुटले त्यांना आम्ही जेलपर्यंत आणून ठेवले आहे. त्यानंतर आता नवीन सरकार आल्यावर कारवाई सुरू झाली आहे. गेल्या 5 महिन्यांत आम्ही त्याची झलक दाखविली आहे.