पुणे – बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर भवानी पेठेतील लक्ष्मी बाजार, हडपसर, कॅम्प, खडकी कॅन्टोन्मेंट, कोंढवा भागात झालेल्या बोकड विक्रीत फक्त 3 ते साडेतीन कोटी रूपयांची उलाढाल झाली. तर, विशाल ताडे या व्यापाऱ्यांच्या एका बोकडाला तब्बल 65 हजार रूपये दर मिळाला.
पाऊस आणि पुराच्या परिस्थितीमुळे बाजारात बोकडांची संख्या घटली असून ग्राहकांनीही सुरूवातीला बोकड खरेदीकडे पाठ फिरविली होती. मात्र, ईदच्या (सोमवार, दि.12) दिवशी ग्राहकांनी बोकड खरेदीला चांगला प्रतिसाद दिला.
भवानी पेठेतील लक्ष्मी बाजारात औरंगाबाद, उस्मानाबाद, बीडसह उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा येथून बोकड विक्रीसाठी दाखल झाली होती. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा फटका बसल्याने कमी प्रमाणात बोकड बाजारात दाखल झाली. गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने जागेअभावी बोकडांच्या खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. मात्र, रविवारी आणि ईदच्या दिवशी ग्राहकांनी बोकड खरेदीला गर्दी केली. त्यामुळे व्यापाऱ्यांकडील सर्व बोकडांची विक्री झाली, अशी माहिती मटण दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि लक्ष्मी बाजारचे विनोद गायकवाड यांनी दिली.
कांबळे म्हणाले, “बाजारात बरबरी, सिहोर, बोर, कश्मिरी, उस्मानाबादी, चंबल घाटी आदी बोकड बाजारात विक्रीस होती. 20 ते 100 किलोंपर्यंत बोकडे बाजारात होते. त्यांची 10 ते 25 हजारांपर्यंत विक्री केली झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत बोकडांची संख्या यंदा कमी होती. दरवर्षी सुमारे 5 ते 6 हजार बोकडे विक्रीसाठी दाखल होत असतात. यंदा पाऊस आणि दुष्काळ परिस्थितीमुळे फक्त 3 ते साडेतीन हजार बोकडांची विक्री झाली.’
पाऊस, पुराचाही व्यापारावर परिणाम
दरवर्षी कर्नाटकसह सातारा, कोल्हापूर, सांगली भागातून मोठ्या प्रमाणात बोकडांची आवक होत असते. यंदा पुरस्थितीमुळे कर्नाटकसह सातारा, कोल्हापूर, सांगली भागातील अनेक पशुधन पुरात वाहून गेले असून सध्या या भागातील रस्ते बंद आहेत. परिणामी, या भागातून यंदा बाजारात बोकड विक्रीसाठी दाखल झाले नाहीत.