बीड: जालना येथे सराटे अंतरवालीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तसेच आंदोलनेही केली जात आहे. या घटनेप्रकरणी विरोधी पक्षासह अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यातच आता जालनामधील घटनेच्या निषेधार्थ बीडमधील बेलवाडी ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत भाजपला मतदान करणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
सध्या केंद्रात भाजपची सत्ता आहे, आरक्षणाचा तिढा केंद्रातून सुटू शकतो. त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावकरी येणाऱ्या लोकसभेला भाजपाला मतदान करणार नाहीत अशी शपथच आता बेलवाडी येथील गावकऱ्यांनी घेतली आहे. तसेच या गावाने घेतलेल्या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू झाला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाजातून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सरकारवर रोष व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या लाठीचार्जमुळे अनेकजण जखमी झाले आहे. यात महिलांचा देखील समावेश आहे. तर या घटनेत काही पोलिस देखील जखमी झाले आहेत.