नवी दिल्ली – करोना संपुष्टात आल्यानंतर अर्थव्यवस्थेला वेग येण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे प्रकल्प हाती घेतले आहेत. खासगी कंपन्यांनी पुढाकार घेऊन आता गुंतवणूक करण्याची हीच वेळ आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात अर्थसंकल्पाच्या भाषणातही निर्मला सीतारामन यांनी खाजगी क्षेत्राने पुढे येऊन गुंतवणूक करावी असे आवाहन केले होते. लॉकडाऊन नंतर मागणी कमी झाल्यामुळे खासगी क्षेत्राची उत्पादकता कमी झाली आहे. त्याचबरोबर नागरिकांची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे खरेदी कमी होत आहे. अशा परिस्थितीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यामुळे खासगी क्षेत्राने गुंतवणूक वाढवून उत्पादनक्षमता वाढवावी असे सीतारामन यांनी सांगितले.
खासगी कंपन्यानी गुंतवणूक वाढावावी याकरिता नव्या कंपन्यांना कंपनी करात सवलत देऊन तो केवळ 15 टक्के करण्यात आला आहे. त्याचबरोबर अणूऊर्जा, अंतराळ संशोधन अशी महत्त्वाची क्षेत्रे केंद्र सरकारने खाजगी उपक्रमासाठी खुली केली आहेत. याचा वापर या कंपन्यांनी करून घेण्याची गरज आहे. भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सीतारामन यांनी सांगितले की, अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येण्यासाठी काम करणे फक्त केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे काम नाही.
यासाठी खासगी कंपन्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आगामी काळामध्ये खासगी कंपन्यांना प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार उद्योग धंद्यातून बाहेर पडत आहे. त्यामुळेच निर्गुंतवणूकीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या.