मुंबई – भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौर्यावर आहे. सेंच्युरिअन येथिल पहिला कसोटी सामना जिंकत भारताने या दौर्याची सुरुवात गोड केली आहे. तसेच यावेळी भारताला दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.
त्यामुळे चाहत्यांच्या नजरा भारत-दक्षिण आफ्रिकेचा इतिहास जाणून घेण्यावर खिळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लेखातून कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक बळी घेणार्या गोलंदाजांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत.
1) अनिल कुंबळे (84 बळी)
अनिल कुंबळे क्रिकेटच्या इतिहासातील महान गोलंदाज ठरला आहे. कुंबळेने आपल्या कसोटी कारकिर्दीत जे टप्पे गाठले आहेत ते कोणत्याही भारतीय गोलंदाजासाठी सोपे नाहीत. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणार्या अनिल कुंबळेचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धही एक अप्रतिम विक्रम आहे. कुंबळे, त्याच्या कसोटी कारकिर्दीत भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे.
त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 21 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 31.79 च्या सरासरीने 84 बळी घेतले. यादरम्यान अनिल कुंबळेने एका डावात तीन वेळा 5 बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे. यामध्ये 1992 च्या दक्षिण आफ्रिका दौर्यातील जोहन्सबर्ग येथे झालेल्या दुसर्या कसोटी सामन्यात कुंबळेने पहिल्या डावात 2 तर दुसर्या डावात 6 बळी मिळवत आफ्रिकन फलंदाजांची भंबेरी उडवली होती.
2) जवागल श्रीनाथ (64 बळी)
भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ हे जागतिक क्रिकेटमध्ये मोठे नाव आहे. जवागल श्रीनाथने त्याच्या काळात कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघासाठी दीर्घकाळ आघाडीच्या गोलंदाजाची जबाबदारी पार पाडली. त्याच्या गोलंदाजीत जबरदस्त स्विंग होता.
माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील कामगिरी प्रभावी राहिली आहे. श्रीनाथने त्याच्या कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 13 कसोटी सामने खेळले ज्यात त्याने 24.48 च्या सरासरीने 64 बळी घेतले. यादरम्यान त्याने चार वेळा एका डावात 5 बळी घेण्यातही यश मिळविले आहे.
3) हरभजन सिंग (60 बळी)
माजी फिरकीपटू हरभजन सिंगने जगातिल दिग्गज गोलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. हरभजन सिंग हा भारतातील सर्वात यशस्वी ऑफ-स्पिन गोलंदाजांपैकी एक होता. भज्जीचा प्रत्येक देशाविरुद्ध अप्रतिम गोलंदाजीचा विक्रम असला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याची कामगिरी वेगळ्या उंचीवर राहिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत हरभजन सिंग तिसर्या क्रमांकावर आहे. भज्जीने 11 सामन्यांत 28.40 च्या सरासरीने 60 बळी घेतले. यादरम्यान त्याने चार वेळा एका डावात 5 बळी मिळवले आहेत. तर 2010 च्या दक्षिण आफ्रिका दौर्यातील तिसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावत हरभजनने 120 धावा देत 7 फलंदाजांना तंबूत धाडले होते.