नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना मुळापासून साफ करून मोदी सरकार श्रीमंत मित्रांचा विकास करत आहे. ही विधेयके काळा शेतकरी कायदा असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
संसदेत सध्या अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, रविवारी राज्यसभेत दोन कृषी विधेयके मंजूर करण्यात आली. या विधेयकाला कॉंग्रेस आणि विरोधीपक्षांचा विरोध आहे. यावरून राज्यसभेतील गदारोळ अद्यापही सुरू आहे.
युवक कॉंग्रेसच्या वतीने विधेयकाच्या विरोधात दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यात आला. संसदेत पोहोचण्याआधीच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. सरकारने पारित केलेल्या विधेयकच्या विरोधात संपूर्ण देशभर निदर्शने सुरू असून संसद परिसरात देखील निलंबित खासदारांनी अनोखे आंदोलन केले. अगदी सभापतींनी देऊ केलेला चहासुद्धा नाकारला.
राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकांवेळी जनतेला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. तसेच ते 2015 ला काय बोलले याची देखील आठवण करून दिली आहे. यानंतर 2020 मध्ये काळा शेतकरी कायदा आणल्याचा उल्लेख राहुल गांधींनी केला आहे.