मुंबई – पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा सोमवार 1 मार्चपर्यंत राजीनामा घ्यावा. अन्यथा विधीमंडळाच्या सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. संपूर्ण राज्यभर आंदोलनाचे रान उठवू’असा इशारा भाजप पक्षाने केला आहे. तर याच मुद्यावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे.
त्या माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या,’ आज संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाहीतर त्यांची हकालपट्टी करा, सगळे पुरावे असतांना गुन्हा दाखल होत नाही, ऑडिओ क्लिप्स आहेत, त्याबद्दल कारवाई नाही, मंत्र्याला वाचवण्यासाठी सरकार केविलवाणा प्रयत्न करताय’ असं म्हणत त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनामाची मागणी केली आहे.
दरम्यान, मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.