ढाका – बांगलादेशातील आवामी लीग पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने देशातील सर्व राजकीय पक्षांना पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. या निवडणुकीसाठी देशात काळजीवाहू सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारने सपशेल फेटाळून लावला आहे. काळजीवाहू सरकार स्थापन करण्याची मागणी देशातील बांगलादेश नॅशनल पार्टीने केली होती. त्यानुसार काळजीवाहू सरकार स्थापन केले जाणार नाही, असे कृषिमंत्री मोहम्मद अब्दुर रझ्झाक यांनी म्हटले आहे.
बांगलादेशातील निवडणुकीशी संबंधित व्यक्तींना व्हिसा न देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे चुकीचा संदेश गेला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये लष्कराने 1975 मध्ये जसा हस्तक्षेप केला होता, तसा हस्तक्षेप केला जाण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका स्वतंत्र निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातील, असेही ते म्हणाले.
शेख हसिना यांनी “बीएनपी’ नेत्या बेगम खालिदा झिया यांच्याशी संपर्क साधून सर्व पक्षांनी निवडणुकीत सहभागी व्हावे. निवडणुकीवर बहिष्कार घालू नये, असे आवाहन केले आहे. मात्र बेगम कालिदा झिया या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचेही रझ्झाक यांनी सांगितले.
2014 च्या निवडणुकांवर होता बहिष्कार…
“बीएनपी’च्या नेतृत्वाखालील आघाडीने 2014 च्या निवडणुकांवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे शेख हसिना यांच्या आवामी लीग पक्षाने निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत “बीएनपी’ला केवळ 7 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.