सातारा – राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना कोठेही दंगली घडल्या नाही. पण, जातीय तेढ आत्ताच का निर्माण होत आहे याचा विचार करण्याची गरज आहे. काही पक्ष व त्यांचे प्रवक्ते त्यांच्या बेतालपणामुळे दंगलींसाठी खतपाणी मिळत असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते, आमदार अजित पवार यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन कार्यकारी अध्यक्षांची निवड ही सर्वसंमतीने झाली असून माझ्यासह पक्षात कोणीही नाराज होण्याचा विषयच नाही, असा निर्वाळाही श्री. पवार दिला.
सातारा येथे विविध कार्यक्रमांसाठी अजित पवार आले होते. याप्रसंगी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, अडीच वर्षे आम्ही सत्तेत होतो. महाविकास आघाडीने राज्यात कुठेही जातीय तेढ निर्माण होवू दिली नाही. मात्र, भाजप व शिंदे गटाचे सरकार सत्तेत आल्यापासून जातीय तेढ निर्माण होऊन दंगली भडकवल्या जात आहेत. औरंगजेबाचे उदात्तीकरण महाराष्ट्रात कदापिही खपवून घेतले जाणार नाही. मात्र, सरकार म्हणून त्यांनीही जबाबदारी स्वीकारुन कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे.
राज्याच्या अनेक भागात जातीय कलह निर्माण होत आहे. महाराष्ट्राच्या परंपरेसाठी ही बाब घातक आहे. सरकार कोणाचेही असो मात्र सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत. अशा घटनांचा तपास सरकारने करुन यामागील मास्टर माईंड शोधून काढण्याची गरज आहे. सोशल मिडियावर चुकीच्या पोस्ट टाकल्या जात असल्याने त्या ठिकाणी तणावही निर्माण होत आहे. काही पक्ष व त्यांचे प्रवक्ते वातावरण गढूळ बनवण्याचे काम करत असून त्यांना शिस्त लावावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली. अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. पक्षात कोणावरही अन्याय होत नाही. दोन कार्यकारी अध्यक्षांची निवड ही माझ्या संमतीनेच झाली आहे. त्यामुळे माझ्या नाराजीचा विषयच येत नाही. शनिवारी दिल्ली येथील बैठकीस मी गेलो होते. आधी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर दुसऱ्या बैठकीस मी हजर होतो. मात्र, याचाही चुकीचा अर्थ काढण्यात आला. निवडी झाल्यानंतर माझी प्लाईट चार वाजता असल्याने मी तात्काळ निघालो. त्यामुळे प्रसारमाध्यमांचा गैरसमज झाला.
पक्षात कोणीही नाराज नाही. मी राज्यात काम करत असल्याने मला राज्यात महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रात काम करण्याची आपली मुळीच इच्छा नाही. माझ्या नाराजीच्या वावड्या काहींकडून उठवल्या जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मला अनेक महत्वाची पदे दिली असून राज्याचा विरोधी पक्षनेता हे मोठे जबाबदारीचे पद मिळाले आहे. पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतलेले निर्णय हे सर्वांना विश्वासात घेऊनच आहेत. मला केंद्रात रस नसून मी खासदार म्हणून यापूर्वी काम केले आहे. सध्या मला राज्यातच काम करायचे असून पवार साहेबांनी भाकरी फिरवली हे मिडियानेच परस्पर मांडले आहे.
त्यामुळे मी नाराज असल्याच्या चर्चांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजप व शिंदे गटाची सत्ता असून सरकारच्या चुकीच्या निर्णयावर विरोधी पक्षनेता म्हणून मी नेहमी आवाज उठवत आहे. महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी आपण काम करत असून सत्तेत असो वा विरोधात फक्त महाराष्ट्राचाच विचार केला आहे. सध्याचे सरकार हे फक्त घोषणाबाजी करत असून प्रत्यक्षात मात्र मदत मिळत नाही. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून राज्यभर दौरा काढून सत्ताधाऱ्यांचे चुकीचे काम पुढे आणले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात राष्ट्रवादीचाच खासदार निवडून येणार
सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभेसाठी अनेक जण इच्छुक असून महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर झाल्यानंतर उमेदवाराची घोषणा केली जाईल. राष्ट्रवादीत अनेक इच्छुक असून या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा असल्याने ही जागा निश्चित राष्ट्रवादी जिंकेल. राष्ट्रवादीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मास्टर प्लॅन तयार केला आहे. आमच्या पक्षातील काही आमदारांना मंत्रिपद, पालकमंत्रिपद देतो असे सांगण्यात आल्याने त्यांनी पक्ष सोडला. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राजकीय पक्षांना इनकमिंग, आउटगोईंग नवे नाही. आगामी निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यावर भर असून काही ठिकाणी स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येणार आहेत. भाजप व शिंदे गटाला रोखण्यासाठी निर्णय होतील. मी पक्ष संघटनेचा विचार करतो, असे सांगून पवार यांनी ‘मी कधी मॅच फिक्सिंग केले नाही. राजकीय पक्षातील मित्रांनी माझी जास्त काळजी करू नये,’ असा चिमटा विरोधकांना काढला.