नगर – नगर शहरात भविष्यकालीन मिरवणुकांसाठी प्रशासकीय सोईच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – इंपिरियल चौक – माळीवाडा वेस – आयुर्वेद कॉर्नर – अमरधाम समोरून- नेप्तीनाका- दिल्लीगेट असा मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून या मार्गाच्या निश्चितीसाठी सूचना अथवा हरकत मागविण्यात आला आहेत. येत्या 30 जूनपर्यंत लेखी स्वरूपात गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे समक्ष सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
शहराच्या हद्दीत डीजे, डॉल्बी सिस्टिम लावून शोभा मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – माळीवाडा वेस – पंचपीर चावडी – तख्ती दरवाजा – कापड बाजार ते तेलीखुंट – चितळेरोड- चौपाटी कारंजा ते दिल्लीगेट या मार्गाने काढण्यात येतात. या मिरवणूक मार्गातील रस्ते लहान आहेत. मिरवणुकीत विविध मंडळाच्यावतीने ठेवण्यात आलेल्या पुतळ्यांची उंची ही 15 फुटापेक्षा जास्त असल्याने मिरवणूक मार्गावरील विद्युततारा व दूरध्वनीच्या तारामुळे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते.
मिरवणूक मार्गावर हिंदू-मुस्लिम संमिश्र लोकवस्ती असलेली ठिकाणे असल्याने त्या ठिकाणी किरकोळ कारणावरून वाद होऊन मोठया प्रमाणावर जातीय तेढ निर्माण झालेला असून एकमेकांविषयी द्वेषभावना वाढीस लागल्याचे निदर्शनास येत आहे. सर्व प्रकारच्या मिरवणूका या कापड बाजारातून जात असल्याने बॅरिकेटिंगमुळे व्यावसायिकांचे व्यवहार बंद होतात. त्यामुळे बाजार पेठेतील ग्राहकांचे व व्यापाऱ्यांच्या मनामध्ये नाराजी निर्माण झालेली असून ते रोष व्यक्त करत आहेत.
मागील काही मिरवणुकामध्ये दगडफेक, खुनी हल्ले, अश्या प्रकारचे अनुचित प्रकारदेखील घडलेले आहेत. यामुळे संबंधित पोलीस यंत्रणेमार्फत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33 (ओ) अन्वये भविष्यातील मिरवणूका व दीर्घकालीन भविष्यकालीन परिस्थिती डोळ्यासमोर ठेऊन पर्यायी मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
यापुढील कालावधीमध्ये काढण्यात येणारे श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक, कत्तलची रात्र व मोहरम विसर्जन मिरवणूक या पारंपारिक उत्सव मिरवणूक वगळता शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेच्या दृष्टीकोनातून कापड बाजारातून सर्व प्रकारच्या मिरवणूका न नेता प्रशासकीय सोईनुसार भविष्यकालीन मिरवणुकांसाठीच्या प्रस्तावास मान्यता देणे प्रस्तावित आहे. संबंधितांनी त्यांच्या लेखी स्वरुपातील सूचना अथवा हरकती दि. 30 जूनच्या आत दाखल कराव्यात. मुदतीनंतर सूचना अथवा हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असेही प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.