सातारा – मोदी सरकारने नऊ वर्षाच्या कार्यकाळात दिलेली आश्वासने पाळली नाहीत. दिवसेंदिवस मोदी व भाजपबद्दल देशात नाराजी वाढत असून कर्नाटक राज्याच्या निवडणुकीत भाजप व मोदींचा पराभव झाल्याने आगामी काळात भाजप व मोदींची जादू चालणार नाही, हे सिध्द झाले आहे. 2024 च्या निवडणुकीत मोदींविरोधात 20 पक्ष एकत्र आले असून या निवडणुकीत भाजप सत्तेतून हद्दपार होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
जिल्हा कॉंग्रेस कमिटीतील आढावा बैठकीनंतर आ. चव्हाण पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मोदींच्या 9 वर्षाच्या कारभारावर कॉंग्रेस अंकुश ठेवणार आहे. महागाई, बेरोजगारी, महिला, युवतींवर अन्याय, अत्याचार, शेतकरी प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, उद्योगधंद्यांची झालेली पीछेहाट आदी मुद्यांवरुन मोदी सरकारला घेरण्यात येणार आहे. संघटीत लढा दिल्यास मोदींचा पराभव होऊ शकतो. मागच्या काही महिन्यात मोदी आणि भाजप यांची मोठी हवा होती. मोदींना कोणी पराभूत करु शकत नाही अशा वल्गना करण्यात येत होत्या. मात्र, कर्नाटक निवडणुकीत भाजप आणि मोदी यांचा पराभव झाल्याने भाजपची चलबिचल वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपने वेगवेगळी अभियाने सुरु केली आहेत. मोदींविरोधात 20 पक्ष एकत्र आले असून आम्ही एकत्र येऊ नये, यासाठी मोदींकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, 2024 च्या निवडणुकीत भाजप आणि मोदी हटाव हा एककलमी कार्यक्रम देशात राबवायचा असल्याने समविचारी पक्ष एकत्र येत आहेत, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. सध्या जागावाटपाबाबत आढावा घेण्यात येत असून पंतप्रधानपदाचा उमेदवार नंतर ठरवण्यात येईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाणार असून भाजपविरोधात एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न असणार आहे.
मतविभागणी टाळल्यास भाजपचा पराभव अटळ आहे. राज्यात 48 मतदारसंघात जागावाटपात महाविकास आघाडीत तिन्ही घटकांना बरोबर घेऊन जावे लागणार आहे. जागा वाटपाच्या निर्णयावर दिल्लीत शिक्कामोर्तब होईल, असे त्यांनी सांगितले.केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. मात्र, या दोन्ही सरकारच्या माध्यमातून मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून केवळ अडवाअडवी आणि जिरवाजिरवीचे राजकारण सुरु आहे. मुलभूत प्रश्नांना बगल मिळावी म्हणून वेगवेगळे इश्यू घडवून आणले जात आहेत, असे सांगून चव्हाण म्हणाले, जातीय तेढ निर्माण करुन समाजासमाजांत वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न काहींकडून होत आहे.
दोन हजारांच्या नोटा बंद करून नेमकं मोदींनी काय साधले. मुळात दोन हजारच्या नोटा काढायचीच गरज नव्हती. संजय राऊत यांच्या वैयक्तिक वादावर मी बोलणार नाही. मात्र शिवीगाळ, असभ्य वर्तन कोणी करु नये. अशा मुद्यांमुळे महत्वाची विषय बाजूला राहत असल्याचेही आ. चव्हाण म्हणाले. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई, अजित पाटील – चिखलीकर, राजेंद्र शेलार, अन्वर पाशाखान, धनश्री महाडीक, रजनी पवार आदी उपस्थित होते.
रेल्वे अपघाताच्या सीबीआय चौकशीचा फार्स
ओडिशातील रेल्वे अपघाताची सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. यंत्रणांचे अपयश झाकण्यासाठी सीबीआय चौकशीचा फार्स असून सीबीआयच्या चौकशीतून फारसं काही निष्पन्न होईल, असे वाटत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी रेल्वे सुरक्षेसाठी विचार केला पाहिजे. यामधील किती सुरक्षा फंड खर्च झाला आहे याबाबतची माहिती जनतेसमोर आली पाहिजे. त्याचबरोबर रेल्वे अपघात प्रश्नी रेल्वेमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली.
खा. ब्रिजभूषण सिंह यांच्याबाबत मोदींचे मौन
महिला पैलवानांचे लैगिंग शोषण केल्याच्या सात तक्रारी भाजपचे खा. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दाखल आहेत. यातील एक तक्रार पोक्सोअंतर्गत आहे. मात्र, ब्रिजभूषण यांच्यावर दिल्ली पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याबाबत मौन पाळले आहे. ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ते ठाकूर समाजातील असल्यामुळे त्या भागात त्यांचा प्रभाव असल्याने त्यांना हात लावला जात नाही. या मुद्यावर कॉंग्रेसच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
==================