Radhakrishna Vikhe Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढा देत आहे. मात्र ओबीसींमधून आरक्षण देण्यास मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. यासाठी छगन भुजबळ यांनी अंबड येथे एल्गार सभा घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले होते. यावरून आता आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे.
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एल्गार पुकारल्यानंतर त्याला प्रतिकार म्हणून मंत्री छगन भुजबळांनी केलेल्या टीकेनंतर आता सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील निशाणा साधला. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळांच्या भूमिकेला विरोध केला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “मनोज जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाची जी मागणी आहे त्या मागणीला सरकारची संमती आहे. मात्र, दोन जानेवारीपर्यंत जर सरकारने मुदत घेतली असेल तर जरांगे पाटलांनी देखील संयम ठेवायला हवा. छगन भुजबळ यांनी जो ओबीसीचा उठाव केला त्याची आवश्यकता नव्हती. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असती, तर हा उठाव ठीक होता. पण कुणीतरी आरक्षण मागत आहे म्हणून त्यांना विरोध करण्यासाठी ओबीसींचे आंदोलन उभा करायचं हे योग्य नाही.”
यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. महाराष्ट्रातील पनवती दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करत असल्याची टीका संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली होती. त्यावर बोलताना विखेंनी संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यांच्यावर कशाला वेळ घालवायचा असा टोला संजय राऊत यांना लगावला.
दूध दराबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. सध्या दुधाची आवक प्रचंड आहे. पूर्वी दूध पावडर किंवा बटरमध्ये कन्वर्जन करायचे, त्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्याने त्याची निर्यात पूर्णपणे थांबून गेली आहे. निर्यातीला जर आपण प्रोत्साहन देऊ शकलो आणि कन्वर्जनला जर संधी मिळाली तर भाव वाढण्यात मदत होईल. भेसळ दुधासंदर्भात कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे दूध दर वाढीसाठी मदत होईल अशी आशा राधाकृष्ण विखेंनी व्यक्त केली.