मुंबई – मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे-पाटील यांनी नऊ दिवसांपासून उपोषण सुरू केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेत विशेष अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाबाबत कायदा करावा, अशी मागणी केली आहे.
ठाकरे गटाच्या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, सचिन अहिर, विनायक राऊत यांच्यासह इतर आमदारांचाही समावेश होता. अंबादान दानवे म्हणाले, संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे.
दिल्लीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर केंद्राने तातडीने अध्यादेश काढताना कायदा केला होता. त्याप्रमाणे आताही सरकारने विशेष अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाबाबत कायदा करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे, असे ते म्हणाले.
सरकारच्या काही मंत्र्यांकडून मराठा आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न होत आहे. विविध आमिषे, प्रलोभने दाखवण्यात येत आहे. मात्र, आता मराठा समाज अशा भूलथापांना भूलणार नाही.
कारण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकार मराठा आंदोलकांवर लाठीमार करत आहे. मराठा हिंदू नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करताना आम्ही आमची भूमिका राज्यपालांपर्यंत पोहचवलेली आहे. ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी भूमिका घ्यावी, असे दानवे म्हणाले.