लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभेत पुन्हा एकदा राहुल गांधींवर जोरदार चर्चा झाली. आता तुम्ही विचार करत असाल की काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचे यूपी विधानसभेत काय काम ? मात्र, गेल्या दोन दिवसांत उत्तर प्रदेश विधानसभेत राहुल गांधींचा दोनदा उल्लेख झाला.
दोन्ही वेळा राज्यातील दोन प्रमुख नेत्यांनी राहुल गांधींचा उल्लेख केला. एक दिवस आधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी राहुल गांधींचा संदर्भ दिला होता. त्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी योगींनी देखील राहुल गांधींचाही उल्लेख केला आहे.
अर्थसंकल्पीय भाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्या भाषणाचे कौतुक केले. तसेच, भाषणादरम्यान अखिलेश अनेकवेळा भरकटल्याचं त्यांनी म्हटलं. अखिलेश यादव यांच्या भाषणाची खिल्ली उडवत सीएम योगींनी दुष्यंत कुमार यांचा ‘कैसे मंजर सामने आने लगे हैं, गाते-गाते लोग चिल्लाने लगे हैं’ हा शेर वाचला.
योगी म्हणाले की, आपले शब्द ब्रह्म आहेत. आपण जे बोलतो त्याचा नाश होत नाही. तुम्ही सभागृहात काहीही बोललात तर ते कामकाजाचा भाग बनते. जोपर्यंत लोकशाही आहे, विधानसभा असेल, तोपर्यंत या सर्व गोष्टी रेकॉर्डवर असतील. लोकांना विचार करायला लावतील. त्यामुळे आपण आपले शब्द काळजीपूर्वक वापरले पाहिजे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी अखिलेश यादव यांच्या भाषणाचा संदर्भ देत म्हटलं की, अखिलेश यादव यांना एका शाळेतील मुलांनी राहुल गांधी म्हटलं होतं. हाच धागा पकडून योगी म्हणाले की, राहुल गांधी आणि तुमच्यात फारसा फरक नाही. राहुल देशाबाहेर जावून देशाची बदनामी करतात. तर तुम्ही उत्तर प्रदेशच्या बाहेर जावून राज्याची बदवानी करता. योगी पुढं म्हणाले की, उत्तर प्रदेशात जो काही विकास झाला ते आम्हीच केला असं मी कधीच म्हणत नाही. आपण सर्वांनी केला, असंही योगींनी अखिलेश यांच्यावर टीका केली.