पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांची दर्पोक्ती
वॉशिंग्टन – भारताबरोबर शांततेसाठी कोणतेही मोल मोजण्यासाठी पाकिस्तान सध्या तयार नाही. जोपर्यंत काश्मीरचा मुद्दा सोडवला जात नाही, तोपर्यंत भारताबरोबर कोणत्याही शांतता प्रक्रियेसाठी पाकिस्तानची तयारी नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.
“सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक ऍन्ड इंटरनॅशनल स्टडीज’ने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये बोलताना कुरेशी यांनी पाकिस्तानची भूमिका मांडली. पाकिस्तानला आर्थिक विकास आणि सुधारणा हव्या आहेत. तसेच पाकिस्तानला शांतताही हवी आहे. मात्र भारताबरोबरच्या शांततेसाठी कोणतीही किंमत मोजायला पाकिस्तानची तयारी नाही, असे कुरेशी म्हणाले.
भारतातील दारिद्रय दूर करण्यापेक्षा भारतातील संघाच्या प्रेरणेचे सरकार देशात “हिंदूराष्ट्र’ आणण्याच्या प्रयत्नात आहे. हिंदुत्व आणि अखंड भारतासाठीच्या या वाढत्या अट्टहासाचे अतिशय घातक परिणाम भारतामध्ये आणि सर्व जगभर दिसले आहेत, असेही कुरेशी म्हणाले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरचा मुद्दा सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी, या आपल्या पूर्वीच्याच मागणीचा कुरेशी यांनी पुनरुच्चार केला. गेल्या वर्षी 5 ऑगस्टला भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम रद्द करून दोन स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश निर्माण करण्याचा निर्णय घेतल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. भारताच्या या कृतीवर पाकिस्तानने मोठी आगपाखड केली होती. या मुद्दयावर पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मिळवण्याचा प्रयत्न वारंवार केला गेला आहे. मात्र दरवेळी त्यामध्ये पाकिस्तानला अपयशच आले आहे.