नवी दिल्ली – रशियाने भारतासाठी एस 400 क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरू केले आहे. हे हवेतील लक्ष्यावर जमीनीवरून मारा करणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. ही क्षेपणास्त्रे भारताला 2025 पर्यंत दिली जाणार आहेत. रशियाचे एक प्रमुख अधिकारी रोमन बाबुश्कीन यांनी सांगितले की, भारत आणि रशिया संयुक्तपणे भारतासाठी कामोव्ह हलकी लष्करी हेलिकॉप्टर्स तयार करणार आहेत आणि त्या विषयीच्या कराराला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
रशियाचे भारतातील राजदूत निकलाय कुदाश्वेव यांच्या समवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बाबुश्कीन यांनी सांगितले की, रशियाकडून भारताला कलाश्निकोव्ह रायफलीही पुरवल्या जाणार असून त्या पाच हजार रायफलींचा पहिला हप्ता भारताला याच वर्षी दिला जाणार आहे. संरक्षण विषयक व्यवहाराच्या बाबतीत आम्ही पेमेंटच्या प्रश्नावर यशस्वी तोडगा काढला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एस 400 क्षेपणास्त्राचे उत्पादन रशियाने या आधीच सुरू केल असून ही क्षेपणास्त्रे भारताला पुरवण्याची प्रक्रिया सन 2025 पर्यंत पुर्ण केली जाणार आहेत. हा 5 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा व्यवहार असून त्यावर ऑक्टोबर 2018 मध्ये करार करण्यात आला आहे. यापैकी भारताने रशियाला 800 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे पहिले पेमेंटही केले आहे. एस 400 क्षेपणास्त्रे ही जगातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्रे असून त्यामुळे भारताची हवाई मारक क्षमता खूप वाढणार आहे. चारशे किमी अंतरावरील हवेतील लक्ष्याला मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे मिलिटरी हार्डवेअरचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या संबंधात दोन्ही देशांमध्ये लवकरच एक करार केला जाणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.