इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती; पीकं गेली वाया
निमगाव केतकी- इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची दिवाळीत शांतच गेली. शेतपीक नाही पैसा नाही, यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचे चित्र होते. दिवाळी सणही शेतकऱ्यांनी साधेपणानेच साजरा केला. त्यातच परतीचा पाऊस लांबल्याने शेती पीकांचे नुकसान होऊन येथील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप पूर्ण वाया गेलेला असताना रब्बीची पिके तरी येतील, अशी अपेक्षा येथील असताना रब्बीही वाया जाण्याची चिन्हे आहेत. कालव्यांना आवर्तन सुटत नसल्यानेही पाण्याच्या नियोजनाअभावी पीकांचे नियोजन करणे अवघड जात आहे. हाताला काम नाही खर्चाला पैसा नाही, अशी अवस्था इंदापुरातील शेतकऱ्यांची झाली आहे.
नरेगा अंतर्गत (रोहयो) रोजगार हमी योजनेची कामे तालुक्यात सुरू होती. मात्र, ही कामेही सध्या बंद असून रोजगार हमीच्या वेतनाचे पैसेही पूर्णपणे हाती आलेले नाहीत. सुरुवातीला पोस्टात खाते उघडण्यात आले. मात्र, पोस्टामध्ये वेतनाचे पैसे वेळेवर मिळत नाहीत म्हणून राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये खाते खोलण्यास सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात त्यांचा काही फायदा झालेला नाही. पीकपाणी आणि पैसाही नसल्याने शेतकऱ्यांचे सण साधेपणानेच साजरे झाले आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत (नरेगाच्या) 16 प्रकारच्या योजना राबविण्यासाठी शेतकऱ्यांची सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी धांदळ उडत होती. मात्र, प्रत्यक्षात या योजना मंजूर होण्याऐवजी पूर्णपणे बारगळल्या असल्याचे चित्र आहे.
यावर्षी तालुक्यात दिवाळी सण ओल्या दुष्काळाच्या स्थितीमध्ये गेला, उत्पादन कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती येथील शेतकऱ्यांची असून शेतपीकांना कमी दर मिळत असल्यानेही उत्पादनापेक्षा खर्च जास्त झाला आहे. यावर्षी शेतकऱ्यांचे दिवाळीमध्ये दिवाळे निघाले. शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना पूर्णपणे कुचकामी ठरत असून योजना राबविण्यासाठी परिसरात पाऊस नसल्यामुळे पाणीटंचाई चारा टंचाईची प्रमुख समस्या भेडसावत आहे. एकंदरीत जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी निसर्गाच्या रुद्र अवतरामुळे हवालदिल झाला आहे.
इंदापूर तालुक्यात सुरवातीला कोरडा आणि नंतर ओला दुष्काळ यामुळे चारा पीक वाया गेल्याने चारा टंचाईमुळे दुग्धव्यवसाय अडचणीत आहे. आशा स्थितीमध्ये लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकरिता योजना राबविण्याकरिता पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकंदरीत शेतकरी, मजूर, व्यावसायिकांवर दुष्काळी स्थितीचा मोठा परिणाम होत आहे.