भुवनेश्वर : अतीतीव्र बनलेल्या बुलबुल वादळामुळे शनिवारी ओडिशाच्या किनारावर्ती भगाला प्रचंड वेगाच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने झोडपले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्त्यांवरील वाहतूक कोलमडली. जगतसिंगपूर, केंद्रपाडा आणि भद्रक जिल्ह्यात अनेक ठिकठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले, अशी माहिती विशेष मदत आयुक्त पी. के. जेना यांनी दिली.
राज्य सरकार परिस्थिातीवर बारीक लक्ष ठेवून आहे. आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी सर्व उपाय योजना केल्या जात आहेत, असे राज्याचे मुख्य सचिव असित त्रिपाठी यांनी सांगितले. राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि ओडिशा आपत्कालीन शीघ्र कृती दलाचे (ओडीआरएएफ) जवानांनी रस्तावर पडलेले वृक्ष दूर करण्याचे काम सुरू केले आहे.
बंगालच्या उपसागरात वायव्येकडे या वादळाचा केंद्रबिंदू असून त्याच्यावर गोपाळपूर, पाराद्वीप आणि कोलकाता येथील हवामान खात्याच्या रडारवरून लक्ष ठेवण्यात येत आहे. ओडिशामध्ये सर्वत्र पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. तर किनारावर्ती भागात मात्र जोरदार ते अतीमुसळधार पर्जन्यवृष्ठी होण्याची शक्यता बआहे. जगतसिंगपूर, केंद्रपाडा, बालासोर आणि भद्रकसारख्या जिल्ह्यात 70 ते 80 किमी प्रतितास वेगाने वारे वहात आहेत. ते 90 किमी प्रतितास पर्यंत जाण्याची भीती आहे, असे हवामान खात्याच्या भुवनेश्वर केंद्राचे संचालक एच. आर. विश्वास यांनी सांगितले.
केंद्रपाडा जिल्ह्यातील राजनगर भागात शुक्रवारपासून 180 मिमि पावसाची नोंद झाली आहे. राज्याच्या किनारावर्ती सखल भागातून आतापर्यमत तीन हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.