फलटण – नीरा नदी कुठं आहे माहिती नाही ते नीरा देवघर प्रकल्पासाठी तीन हजार 900 कोटी रुपये आणल्याचे सांगत सर्वत्र गवगवा करत आहेत. मात्र, या प्रकल्पासाठी दोन हजार कोटी रुपयांची गरज आहे. मग उरलेले एक हजार 900 कोटी रुपये घेऊन खासदारांना अजून एक कारखाना काढायचा आहे का, असा खोचक सवाल आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला. स्वतःला बोलता येत नाही म्हणून इतर आमदारांना तालुक्यात आणून त्यांचे पीए खासदार झाले आहेत, अशी टीका आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथे शेतकरी मेळाव्यात रामराजे बोलत होते. फलटणच्या हक्काचे पाणी पंढरपूर व सांगोलाला देणारे हे कोण, असा सवाल करीत ते म्हणाले, “”पंधरा दिवसात पंधराशे कोटी आणले तसेच माढा मतदारसंघात लाखो कोटी रुपयांची विकासकामे केल्याचा गवगवा करीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर फिरत आहेत. मात्र, मी मोदींना आडवा चाललो नसतो तर महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी थांबलेच नसते तर तुम्ही काय केले असते, तुम्हाला दिल्लीसाठी निवडून दिले आहे. तुम्ही खाली काय करता. मी आणि आ. दीपक चव्हाण इथे आहोत. तालुक्यातील रेल्वेसाठी प्रयत्न केले. निधी आणला. मात्र, आणलेली रेल्वे पुढे धावलीच नाही. त्याचप्रमाणे नीरा देवघर प्रकल्पाला मी व तत्कालीन राज्य सरकार तसेच खासदार शरद पवार यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करण्याचा खराखुरा प्रयत्न केला. मात्र, राजकारणांत अपप्रवृत्ती आल्याने राजकारणाची पातळी खालावली.
खासदारांनी काढलेल्या साखर कारखान्यामध्ये लोकांच्या ऊसाचे व कामगारांच्या मेहनतीचे पैसे दिले जात नाहीत. आमच्याकडे येत असताना लोक ताठ मानेने येतात. त्याचवेळी खासदारांकडे जाताना लोक बिल्लीप्रमाणे जातात.” सोशल मीडियावर काही बोलला तर त्याला काय केले जाईल याचा नेम नाही. त्यामुळे लोक व पत्रकार खरे लिहण्यास धजावत नाहीत. त्यांना पाहिजे एवढे खाद्य मी देतो मात्र ते मलाच टार्गेट करतात, अशी खंत आमदार रामराजे यांनी व्यक्त केली.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “”नीरा देवधर, धोम बलकवडीच्या कामांचा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न खासदार रणजितसिंह करीत असून मी आणलेल्या पाण्यावरच खासदारांनी कारखाना काढला, हे जगजाहीर आहे. पण त्यांनी आणलेली ट्रेन कधी धावल्याचे पाहिले आहे का, खासदारांनी दिल्लीत कामे करावीत. आम्ही राज्यातील कामे करण्यास समर्थ आहोत, खासदार रणजितसिंह यांनी बजेटमध्ये तरतूद केली आहे त्याचा उलगडा करावा, असे आव्हान त्यांनी दिले. खासदारांनी साखरवाडी कामगारांच्या फंडासंदर्भात धमकीचे फोन केल्याचा गंभीर आरोप यावेळी रामराजे यांनी केला. मी व आमदार दीपक चव्हाण फलटणच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत येणाऱ्या सर्व निवडणुकीत बरोबर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, शिवरूपराजे खर्डेकर, डी. के. पवार, धनंजय पवार, रामभाऊ ढेकळे, विवेक शिंदे, सरपंच सुवर्णाताई नाळे, नंदू शेठ नाळे, राजे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.