नवी दिल्ली – आगामी मोसमासाठी लवकरात लवकर सराव सत्र तसेच शिबिरे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, त्यासाठी खेळाडूंच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी दिले आहे.
करोनाचा धोका कायम असल्याने सध्या देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विविध स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना सराव करता येत नसून असेच चित्र कायम राहिले तर मग प्रत्यक्ष स्पर्धेत कामगिरी कशी होणार हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच ऑलिम्पिक तसेच विविध स्पर्धांना डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंचा सराव सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यासाठी एकाही खेळाडूच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही, असेही रिजीजू यांनी सांगितले.
सरावासाठी योग्य वातावरण असले पाहिजे. सराव करताना खेळाडूंना मुक्तपणे वावरता आले पाहिजे. त्यांच्या मनातून करोनामुळे आलेली भीती दूर करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे खेळाडू सराव करत आहेत त्यांना आरोग्याशी निगडित कोणतेही प्रश्न मनात निर्माण होऊ नये, अशी व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी पाऊले उचलली गेली पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
क्रीडा मंत्रालय सध्या याच गोष्टींवर चर्चा करत आहे. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच याबाबत ठोस निर्णय घेतले जातील. भारतीय क्रीडा प्राधिकरणात देखील आम्ही सध्या अनेक खेळाडूंशी तसेच प्रशिक्षक व आयोजकांशी चर्चा करत आहोत. प्राधिकरणातील नियमित सराव सत्रे सुरू झाली तर खेळाडूंनाही विश्वासाचे वातावरण पाहायला मिळेल.