मुंबई – राज्यात कोरोना रुग्णसंख्येत सौम्यगतीने वाढ होत आहे. रुग्णवाढीमुळे चौथी लाट येण्याची आशंका व्यक्त केली जातेय. मात्र सध्या चौथी लाट येईल अशी कोणतीही चिन्हं नाहीत, असा दिलासा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला दिला आहे. राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे आज राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची वाढ ही अतिशय धीम्या गतीने होत आहे. ही वाढ राज्यातील मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे अशा ठराविक शहरांत होत आहे, अशी माहिती टोपे यांनी यावेळी दिली.
केंद्रीय आरोग्य विभागाकडून गुजरात येथे घेण्यात आलेल्या बैठकीत देशातील सर्व राज्यांमधील आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने त्या राज्यातील मंत्र्यांशी संवाद साधल्याचे राजेश टोपे म्हणाले.
त्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण रुग्णालयात न जाता घरीच बरे होत असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात तुलनात्मकदृष्ट्या तेवढे रुग्ण वाढत नसले तरी आरोग्य विभाग सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. तरीदेखील दुर्दैवाने रुग्णसंख्या वाढल्यास आयसीएमआर आणि केंद्र शासनाच्या नियमावलीची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.