उपाययोजनांबाबत भवताल आणि मैत्र संस्थेने तयार केला अहवाल
पुणे – शहराने यंदा कधी नव्हे तो दोन वेळा पुराचा अनुभव घेतला. ही परिस्थिती का निर्माण झाली? यामध्ये दोष कुणाचा? पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील याबाबतचा एक अहवाल नुकताच भवताल आणि मैत्र संस्थेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. या अहवालात नमूद केलेल्या काही बाबी जरी आपण पाळल्या तरी आगामी काळात उद्भवणाऱ्या पुराच्या संकटापासून आपण वाचू शकतो; अन्यथा शहराचे पुरात वाहून जाणे अटळ आहे.
गेल्या महिन्यात म्हणजे 25 सप्टेंबरच्या रात्री पुणे शहरात कोसळलेल्या पावसाचे वर्णन करतानासुद्धा भयानक असेच करावे लागले. कारण पावसाची संततधार रात्रभर सुरू होती. तो थोडी ही कमी जास्त होताना दिसत नव्हती. या पावसाने पुणेकरांना पुराची तीव्रता किती असू शकते याची जाणीव करून दिली.
या पावसामुळे कात्रज घाटातून उगम पावणाऱ्या आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आणि या पुरात ओढ्याच्या कडेला असणारी घरे आणि सोसायट्यांमध्ये जो हाहाकार उडाला तो विनाशकारीच ठरला. हा पूर ओसरल्यानंतर पर्यावरणासंदर्भात काम करणाऱ्या भवताल या संस्थेने पर्यावरण प्रेमी व नागरिकाच्या सहकार्याने पूर्ण ओढ्याची पाहणी केली. हा प्रकार कसा झाला इतके पाणी घरांमध्ये व सोसायट्यांमध्ये शिरले. याचा पूर्ण अभ्यास या संस्थेच्यावतीने नुकताच करण्यात आला आहे. या अहवालातील काहीबाबींची पूर्तता परिसरातील नागरिकाच्या मदतीने करण्यात येणार आहे. प्रशासनाला सुद्धा हा अहवाल देऊन त्यांची सुद्धा मदत घेण्यात येणार आहे.
आम्ही कात्रजपासून मित्रमंडळ चौकापर्यंत आंबिल ओढ्याच्या कडेकडेने फिरलो आणि त्यांची पाहणी केली. या पाहणीमध्ये अनेक त्रुटी दिसून आल्या.त्यामुळेच पुराची परिस्थिती निर्माण झाली. रस्त्याच्या कडेला असणारी पावसाळी गटारेसुद्धा फारशी कुठेही दिसली नाही. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून राहण्याचे प्रकार वाढले आणि रस्त्यांना पुराचे स्वरूप आले. पाऊस जास्त झालाच त्यात काही दुमत नाही; पण आपत्ती यंत्रणा ही कार्यान्वित व्हायला हवी होती ती काही झाली नाही.
– अभिजित घोरपडे, भवताल संस्थेचे प्रमुख