बेट भागातील तरकारी पिकांना फटका : शेतकऱ्यांच्या माथी सुकाळ
सविंदणे – शिरूर तालुक्यातील बेट भागातील सविंदणे, कवठे येमाई, टाकळी हाजी, मलठण, जांबुत, फाकटे, पिंपरखेड, वडनेर, चांडोह आदी भागात बुधवारी (दि.29) सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार झालेल्या वादळी वारा व पावसाने हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. ऊस, ज्वारी, मका ही पिके मुळापासून उखडून भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागात सतत पाऊस होत असल्याने शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने कांद्याची रोपे, मेथी, धना, शेपू, कोबी, फ्लॉवर, मका, भेंडी, गवार व इतर पिके सडून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या ठिकाणी झालेल्या पिकांच्या नुकसानीचा तहसील व कृषी विभागाने त्वरित पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत तहसील व कृषी विभागाने घटनास्थळी भेटी दिल्या नसून त्यांच्यात उदासीनता दिसून येत आहे. याबाबत शिरूर तहसीलदार लैला शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
शेतकरी बाळासाहेब पडवळ म्हणाले की, उन्हाळ्यात इतर कोणतीही पिके न घेता काटकसर करून ठिबक सिंचन केले. ऐन दुष्काळात ऊस जगवला आहे. परंतू काल झालेल्या वादळी पावसाने मुळासकट ऊस उखडल्याने तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना शिरूर तालुक्यातील नुकसानीबाबत कळवले आहे. प्रत्येक तालुक्यात दोन दिवसांत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार.