चांडोह परिसरात पिके भुईसपाट, घरावरील पत्रे उडाले; दुष्काळातून सावरूनही मरणयातना
टाकळी हाजी – चांडोह (ता. शिरुर) येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने परिसरातील अनेक घरांसह पिके, झाडे भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम व परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.
भाऊबीजेसाठी आलेल्या पाहुण्यांसह संपूर्ण कुटुंब उघड्यावर
शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात चांडोह, फाकटे, पिंपरखेड, जांबुत, काठापूर आदी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अनेक पिके व झाडे भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. चांडोह येथील अशोक विलास भालेराव यांचे पत्र्याचे घर अक्षरशः उडून गेल्याने भाऊबीजेसाठी आलेल्या पाहुण्यांना देखील निवारा उरला नाही. त्यासाठी शेजारील घराचा आसरा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली, असे अशोक भालेराव व बाळू भालेराव यांनी सांगितले. हेअर सलूनच्या दुकानावरील पत्रा देखील उडून गेला आहे. दुकानातील फक्त खुर्चीच शिल्लक राहिली आहे.
किसन गणपत ढगे यांच्या घरावरील कौले उडून गेली आहेत. भिंतही पडलेली आहे. राजेंद्र पडवळ यांच्या घरावरील संपूर्ण पत्रेच उडून गेल्याने त्यांचाही संसार उघड्यावर पडला आहे. पावसासह वादळी वारे इतके जोरदार होते की झाडे, विद्युत पोल देखील भुईसपाट झाली आहेत. चांडोह, पिंपरखेड, संबंधित फिडरवरील विद्युत प्रवाह मंगळवारी संध्याकाळपासून खंडित झाल्याने अनेकांना भाऊबीज अंधारातच साजरी करावी लागली. यामध्ये बेचाळीस पोल भुईसपाट झाले आहेत. त्यामुळे महावितरणचे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले आहे.
हे काम होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतील, असे वायरमन अंकुश रेहपाडे यांनी सांगितले. यावेळी मंचर महावितरण विभागाचे अभियंता प्रकाश खांडेकर व रवींद्र बर्डे यांनी यावेळी पाहणी केली आहे. संबंधितांना लवकरात लवकर काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. परिसरातील नुकसानीची पाहणी मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी केली आहे. संबंधित प्रशासनाना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी उपसरपंच कचर पानमंद, शरद बोंबे, संपत वळसे, सतीश गोडसे आदी पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.