पिंपळगाव येथे ऊस, कांदा, दूध शेतकरी परिषद
यवत – मागील दहा वर्षांपूर्वीचा उसाचा बाजारभाव आणि आत्ताचा असणारा बाजारभाव हा सारखाच आहे. रासायनिक खते, बियाणे, खुरपणी, पाणी आदी खर्च पकडला तर सध्या शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट आहे. जर शेतकऱ्यांना उसाचा योग्य मोबदला नाही मिळाला तर कापूस, सोयाबीन पिकवणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसारखी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील आत्महत्या करण्याची वेळ येईल. तत्पूर्वीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपळगाव (ता. दौंड) येथे शनिवारी (दि. 5) शेतकरी संघटनेची ऊस, दूध, कांदा प्रश्ना संदर्भात शेतकरी परिषद पार पडली. यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांची संपूर्ण भारतीय शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कांदा, दूध, ऊस हे मूलभूत पिकांपैकी महत्वाचे घटक असल्याचे सांगण्यात आले. कारखानदार हे भांडवलदार असून त्यांनी ऊस नियंत्रण कायद्यानुसार उसाची रक्कम ही 14 दिवसांत शेतकऱ्यांना मिळणे बंधनकारक आहे. एमएसपीनुसार त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला गेला पाहिजे. बाहेरील राज्यात उसाला चांगला दर दिला जातो आणि आपल्या राज्यात फरक का? असा देखील सवाल यावेळी त्यांनी केला. वन्य प्राणी संरक्षण कायद्याद्वारे शेतकऱ्यांना वन्य प्राण्यापासून होणारा अपघात लांडगा, मोर, हरीण, बिबट्या यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यात यावे. आशा विविध विषयांवर रघुनाथ पाटील यांनी आपले विचार मांडले.
याप्रसंगी शिवाजी नांदखिले, कालिदास आपेट, पांडुरंग रायते, बाळासाहेब घाडगे, वर्षा काळे, दीपक पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या परिषदेमध्ये शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील नात, राजेंद्र दिवेकर राम गाडेकर, महेश थोरात, ब्रम्हानंद मापारे, राजेंद्र शिंदे, नितीन जावळे, नितीन जगताप, वजीर इनामदार, शरद शिंदे, बापू वाघ, सतीश नातू आदी उपस्थित होते.