मुंबई – महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी 7 नोव्हेंबरपर्यंत कुणीच दावा केला नाही तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजकीय पक्षांना पाचारण करून त्यांच्याशी चर्चा सुरू करतील, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी म्हटले.
राज्यात सरकार स्थापनेबाबतची कोंडी कायम आहे.
त्यापार्श्वभूमीवर, आणखी काही दिवस प्रतीक्षा करून राज्यपाल सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजकीय पक्षांशी चर्चेची प्रक्रिया सुरू करतील, असे संकेत आठवले यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिले. महायुतीमधील लहान घटक पक्षांच्या शिष्टमंडळाने शनिवारी राज्यपालांची भेट घेतली. त्या शिष्टमंडळाने सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण द्यावे, असे साकडे राज्यपालांना घातले.
त्यावेळी सरकार स्थापनेसाठी कुणीतरी पुढे येण्याची प्रतीक्षा करत असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आठवले यांनी दिलेल्या माहितीला महत्व आहे. सत्तावाटपाच्या सुत्रावरून भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे.
त्यामुळे महायुतीच्या सरकार स्थापनेबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. त्यातून सत्तास्थापनेची कोंडी फोडण्यासाठी महायुतीमधील लहान पक्ष सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत.