सुमारे 50 तरूणांनी सोडला दहशतवादाचा मार्ग
श्रीनगर- मानवतेचा स्पर्श असणारी एक विशेष मोहीम लष्कराकडून जम्मू-काश्मीरात राबवली जात आहे. त्या मोहिमेला (ऑपरेशन मॉं) लक्षणीय यश मिळत आहे. त्यामुळे चालू वर्षात आतापर्यंत सुमारे 50 काश्मिरी तरूण दहशतवादाचा मार्ग सोडून सामान्य जीवन जगत आहेत. काश्मीरमध्ये अस्वस्थता आणि अशांतता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. त्यातून तो देश दहशतवादी कारवायांना पाठिंबा देतो.
एवढेच नव्हे तर, काश्मीरमधील स्थानिक तरूणांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादाच्या मार्गावर नेण्याचा नापाक खटाटोप त्या देशाकडून केला जातो. मात्र, दहशतवादाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचा विडा भारतीय लष्कराने उचलला आहे. त्यातून स्थानिक तरूणांनी वाममार्गावर जाऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. ऑपरेशन मॉं हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. पवित्र कुराणात आईची (मॉं) महती विषद करण्यात आली आहे. त्याचा आधार घेऊन लष्कराने ती मोहीम आखली आहे.
त्यामोहिमेंतर्गत बेपत्ता तरूणांचा शोध घेऊन त्यांच्या कुटूंबीयांपर्यंत पोहचण्याचा लष्कराचा प्रयत्न आहे. कुटूंबीयांच्या आणि विशेषत: महिलांच्या मार्फत त्यांच्या मुलांना दहशतवाद सोडण्याचे आवाहन केले जाते. काही वेळा तर दहशतवादी बनलेल्या स्थानिक तरूणांना शरण येण्याची संधी देण्यासाठी सुरक्षा दलांनी मध्यातच चकमकी थांबवल्याच्याही घटना घडल्या आहेत.
त्या घटनांमध्ये स्थानिक दहशतवाद्याच्या आईचा शोध घेऊन त्यांच्यात संवाद घडवला जातो. त्यामुळे शरणागती पत्करून स्थानिक दहशतवादी त्यांच्या कुटूंबांमध्ये परतल्याचीही उदाहरणे आहेत. शस्त्रास्त्रे खाली ठेवलेल्या म्हणजेच दहशतवादाचा मार्ग सोडलेल्या स्थानिक तरूणांची आणि त्यांच्या कुटूंबीयांची ओळख त्यांच्या सुरक्षिततेसाठी उघड केली जात नाही.