विद्यार्थ्यांच्या योग्यता प्रमाणपत्रातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना
पुणे – पुणे विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या 346 विद्यार्थ्यांच्या योग्यता प्रमाणपत्रात त्रुटी आढळून आल्या आहेत. यातील कागदपत्रांच्या त्रूटीची पूर्तता न केल्यास विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात येणार आहेत.
फेब्रुवारी-मार्च घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या अर्जावेळी विद्यार्थ्यांचे योग्यता प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. महाविद्यालयांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नसल्याची बाब पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या निदर्शनास आली. मूळ स्थलांतर प्रमाणपत्र, दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला, इयत्ता दहावी व बारावीचे गुणपत्रक आदी कागदपत्रे योग्यता प्रमाणपत्रासोबत सादर केलेली नाहीत.
पुणे, अहमदनगर, सोलापूर या तीनही जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे योग्यता प्रमाणपत्र प्रस्ताव तातडीने जमा करावेत. तसेच प्रस्ताव आधीच जमा केले असल्यास प्राप्त योग्यता प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत ई-मेल आयडीवर पाठवावी. झेरॉक्स प्रतीवर कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतांक नमूद करणे आवश्यक आहे. मूळ स्थलांतर प्रमाणपत्र असणाऱ्या महाविद्यालयांनी त्रूटीपूर्तता समक्ष येवून करावी, अशा सूचना सचिवांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.