इस्लामपूर – गतवर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीत मी कोथरूडला अडकलो नसतो अन् इस्लामपुरात आमच्यात मतभेद नसते तर जयंतरावांची सुट्टी केली असती. मग ते राज्याचे नव्हे तर तालुक्याचे नेते राहिले असते असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला. काकांबद्दल अजितदादा स्तुती व गोडवे गात आहेत. एवढाच काकांवर जीव असला तर अजितदादांनी गतवर्षी तीन दिवसांसाठी का होईना काकांना सोडले हा इतिहास नाही का? अशी टिकाही त्यांनी केली.
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ.जयकुमार गोरे, आ. गोपीचंद पडळकर, जेष्ठ नेते सी.बी.पाटील, जि.प उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, विजय कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “चंद्रकांत पाटील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. जयंतराव तुमच्या घरात काय चाललयं? तुमच काय स्थान आहे? हे तुम्ही पहा. विषम विचारांचे पक्ष एकत्र येवून वाटून खाऊ अशी आमची वृत्ती नाही. ५ वर्षे सत्ता गेली तर तुमची अवस्था पाण्यातून बाहेर पडलेल्या माश्यासारखी झाली होती आम्हाला अजूनही शांत झोप लागते. काँग्रेस सोनिया गांधी, राष्ट्रवादी शरद पवार, समाजवादी पार्टी मुलायमसिंग यादव, राष्ट्रीय जनता दल लालू यादव असे घराण्यांचे पक्ष आहेत भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस आमदार, खासदार, मंत्री होतो. भाजपमध्ये सर्वात जास्त महिला, मराठा, ब्राम्हण, ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील आमदार आहेत, इतर कोणत्याही पार्टीत आहेत का? हे दाखवून द्या. राष्ट्रवादीचे अरूणअण्णा यांना ७४ व्या वर्षी जिल्ह्यात फिरण्याचा त्रास देणे बरोबर नाही. प्रवास करताना त्यांची दमछाक होईल.”
सदाभाऊ खोत म्हणाले, “प्रस्थापितांच्या विरोधात आयुष्यभर लढाई केली आहे. मरेपर्यंत भाजपसोबत राहणार आहे. भाजपच्या उमेदवाराच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न करू गत लोकसभा निवडणूकीत आम्ही तयारी केली असताना अखेरच्या क्षणी महायुतीच्या उमेदवाराला मदत करत निवडून आणले. चंद्रकांतदादांनी प्रतिनिधीत्व केल्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघ चर्चेचा बनला आहे. या मतदारसंघात भाजपाची विजयी परंपरा कायम राखू.”
सम्राट महाडिक म्हणाले, “वाळवा व शिराळा तालुक्यातील आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे. आम्ही भाजपच्या उमेदवाराला नक्कीच मताधिक्य देवू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत आम्ही ताकद दाखवून दिली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. आ.जयकुमार गोरे,जेष्ठ नेते सी.बी.पाटील यांची भाषणे झाली.
माझ्या नामोल्लेखाशिवाय त्यांचे भाषण अपूर्णच..!
सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री जयंत पाटील यांच्या भाषणाचा प्रारंभ, मध्य व शेवट चंद्रकांत पाटीलच आहे. माझा उल्लेख केल्याशिवाय त्यांचे भाषण पुर्णच होत नाही, अजितदादा, जयंतराव राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे? काय ठरलं होतं हे जाहिररित्या सांगायला लावू नका. तुम्ही दोघांनी कितीही आदळआपट करा भविष्यात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर सुप्रिया सुळेच होतील असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
जयंत पाटलांना पराभूत करायचे असेल तर..
इस्लामपूर मतदार संघातील भाजप व सहयोगी पक्षातील सर्वांनी मने मोठी करावीत. आपआपसातील मतभेद विसरावा लागेल. तुमच्यात कसा वाद होतो मी पाहतो. तुम्ही एकत्र आल्याशिवाय.मतदारसंघात परिवर्तन होणार नाही,असा सल्ला चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.