मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेत्यांच्या विरोधात काही दिवसांपासून ईडी, सीबीआयकडून कारवाई होत असल्याचे चित्र आहे. यावरून सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
ईडी आणि सीबीआयचे प्रयत्न संपले की मग महाराष्ट्रात सैन्य आणा, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच तुम्ही आमच्यावर जेवढे हल्ले कराल तेवढे तिन्ही पक्ष अधिक मजबूत होतील, असेही ते म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातच सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही ठिक असल्याचे दिसून येत नाही. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सडेतोड उत्तरे दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, राज्यपालांना विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत कळकळ आहे. आता राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनीही पत्र पाठवले आहे. राज्यपालांना जेवढी कळकळ विधानसभा अध्यक्ष पदासाठी आहे तेवढी कळकळ विधान परीषदेच्या 12 जागांसाठी असती तर आनंद झाला असता. पण तसं दिसत नाही.
राज्यपालांनी कितीही पत्र पाठवली तरी अस्वस्थ व्हायचे कारण नाही. पत्रांचा ओघ वाढलांच तर त्यासाठी एक वेगळा डेस्क निर्माण करावा लागेल. विधानसभा अध्यक्ष पदासाठी तीनही पक्षांमध्ये एकमत असल्याचे त्यांनी सांगितले.