नवी दिल्ली – रोजगारासाठी रशियात गेलेल्या भारतीय युवकांना तेथे युक्रेनबरोबरच्या युद्धात जुंपले जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीला आल्यानंतर असे प्रकार हेात असल्याची कबुली भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. या प्रकरणी रशियन सरकारशी संपर्क साधला जात असल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
या संबंधात माहिती देताना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, रशियात गेलेल्या भारतीय युवकांना तेथील लष्करात भरती करून घेतले गेले आहे. त्या संबंधात आम्ही सातत्याने रशियन सरकारकडे प्रयत्न करून त्यांना या सेवेतून बाहेर काढण्याची विनंती करीत असून भारतीय युवकांनीही या प्रकाराविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले आहे.
एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी कालच हा खळबळजनक दावा केला होता व त्यांनी अशा फसवणूक झालेल्या काही युवकांची माहितीही दिली होती. या भारतीय युवकांना रोजगारासाठी म्हणून रशियात नेले गेले होते.
त्यावेळी त्यांच्याकडून रशियन भाषेत ज्या पत्रांवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या त्यात त्यांना लष्करात प्रशिक्षण घेण्याची संमती देण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर या युवकांना थेट युक्रेन बरोबरच्या युद्धात जुंपले गेले आहे. त्यामुळे या भारतीय युवकांचा जीव धोक्यात आला आहे.