सातारा – गेली चार वर्षे अपूर्ण अवस्थेत असलेल्या आणि केलेय तेवढे काम निकृष्ट झालेल्या सातारा- म्हसवड- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची चौकशी करुन संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून केली. गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
सातारा- म्हसवड- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरुवातीपासूनच अनेक कारणांनी चर्चेत राहिले आहे. या रस्त्याच्या कामातील दिरंगाईबाबत अनेक ठिकाणी अनेक आंदोलनेही करण्यात आली होती. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. आ. जयकुमार गोरे यांनी अधिवेशनातही या रस्त्याच्या निकृष्ट आणि धिम्या कामाबाबत आवाज उठवला होता.
दिल्लीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटून आ. गोरेंनी साताऱ्यापासून कोरेगाव तसेच पुढे पुसेगावपर्यंत आणि माण तालुक्यातील म्हसवड व पुढे पंढरपूरपर्यंत या रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने आणि निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत अशी माहिती दिली. या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करुन संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली. मंत्री गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. रस्त्याच्या निकृष्ट कामाचे फोटो आणि व्हिडिओ शुटींग अधिकाऱ्यांकडे द्यावे, असेही गडकरींनी आ. गोरे यांना सांगितले.
माण- खटावसाठी केंद्रीय रस्ते निधीची मागणी
दिल्ली येथे मंत्री गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत आ. गोरे यांनी माण- खटावच्या विविध विकासकामांबाबत चर्चा केली. मतदारसंघात केंद्रीय रस्ते निधी मिळावा, अशी मागणी आ. गोरे यांनी केली. मंत्री गडकरी यांनी तसे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली.