Wardha Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचाराला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला विदर्भातील गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीही (PM Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. चंद्रपुरात त्यांची जाहीर सभा पार पडली. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्यादेखील विदर्भातील वर्धा, भंडारा, नागपूरमध्ये सभा होत आहेत.
यावेळी वर्धा येथील सभेत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, उत्तर असो, दक्षिण असो किंवा पूर्व, पश्चिम असो भारतातील प्रत्येक भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले. वर्धा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
योगी आदित्यनाथ यांच्या वर्धा येथील भाषणातील महत्वाचे मुद्दे –
– जागतिक पातळीवर भारताचा सन्मान वाढला आहे.
– भारताच्या पासपोर्टचे महत्त्व वाढले आहे.
– भारताचा सीमावर्ती भाग सुरक्षित झाला आहे.
– मोदी पंतप्रधान होण्याआधी भारतामध्ये शेजारील देशातून मोठ्या प्रमाणात दहशतवाद पसरला जात होता. मात्र, सरकार डोळे बंद करून त्याकडे पाहत होते.
– मुंबई हल्ल्यातील आतंकवादी पाकिस्तान मध्ये लपलेले आहेत. त्या पाकिस्तान मध्ये देखील आता दहशतवादी सुरक्षित नाहीत. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे घडले आहे.
– भारतात एखादा स्फोट झाला तर, या हल्ल्यात आमचा हात नसल्याचे आधी पाकिस्तान सांगतो. याचे कारण पाकिस्तान हा भारताला आता घाबरत आहे. कारण आता भारत सरकार पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला करायलाही मागे पुढे पाहत नाही.
– 1952 ते 2014 पर्यंत जे काम आधीच्या सरकारने केले नाही. ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
– भारतामध्ये दोन निशाण, दोन पंतप्रधान आणि दोन संविधान चालणार नाही, असे आम्ही म्हणत होतो. त्यासाठी कलम 370 हटवण्याचे महत्त्वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
– महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा क्षेत्र विकसित होण्यासाठी नेता, धोरण यासोबतच नियत देखील आवश्यक.
– सध्या विरोधी पक्षाची स्थिती ही ना नेता, ना धोरण आणि ना नियम अशी आहे.
– पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आणि ‘अबकी बार, 400 पार’ चा नारा पूर्ण करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि एनसीपीच्या म्हणजेच एनडीए गटबंधनातील उमेदवारांना विजयी करणे आवश्यक आहे.
– प्रत्येक घरापर्यंत उमेदवार पोहोचू शकत नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी रामदास तडस बनून घराघरात पोहोचणे आवश्यक.
(‘The whole of India believes that Modi will be the Prime Minister again’, the important points of Yogi Adityanath’s speech in Wardha -)