वाई -वाईच्या पश्चिम भागाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर कामाची पद्धत बदलून जनतेशी निगडित पुनर्वसन, पर्यटन आणि सिंचन या त्रिसूत्रीतून प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस कार्यक्रम आखून भविष्यात कार्यरत राहणार असल्याचे पश्चिम भागातील युवा नेते विकास आण्णा शिंदे यांनी जाहीर केले.
विकास आण्णा शिंदे म्हणाले, “”या भागातील पुनर्वसनचे प्रश्न 1972 पासून भिजत पडले आहेत. सामान्य माणसाला शासनाकडे हेलपाटे घालायला लागत आहेत. परंतु, त्यांची योग्य ती दखल घेतली जात नाही. त्यामुळे पुनर्वसनाच्या कामात लक्ष घालून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पश्चिम भागातील सिंचनासाठी 45 कोटींची जललक्ष्मी योजना राबवण्यात आली. परंतु, वितरण व्यवस्थेची कामे अपुरी असल्यामुळे योजना होऊनसुद्धा लोकांच्या शेतीला पाणीपुरवठा होत नाही.
त्यासाठी अतिरिक्त निधी मिळवून पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच या योजनेत समाविष्ट नसलेल्या गावांना पाणी मिळण्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.” पर्यटनवाढीसाठी धरणाच्या दोन्ही बाजूला बोट क्लबचे परवाने मिळवून देणे, चिखली ते पाचगणी घाटरस्ता तयार करणे, पाण्यावर चालणारी विमानसेवा सुरु करणे, धरणाच्या राखीव जागेवर प्रस्तावित सुसज्ज उद्यान होण्यासाठी पाठपुरावा करणे, केटस पॉईंट ते बलकवडी धरण रोप वेसाठी प्रयत्न करुन पर्यटनवाढीसाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम भागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या वाई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत भागाचा विकासात्मक आराखडा आखण्यात आला. विविध गावांमध्ये पुढील बैठका घेऊन लोकांना जागृत करून विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याबाबत लवकरच मेळावा आयोजित करणार आहे. गेल्या निवडणुकीत भागातील जनतेने केलेली चूक पुन्हा केल्यास पश्चिम भाग विकासापासून आणखी मागे राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पश्चिम भागामध्ये तळमळ आणि क्षमता असलेले अनेक लोक आहेत. अशा लोकांनी भागाचा कायापालट करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. भविष्यात विधायक दृष्टीकोन ठेवून पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी राजकारणविरहित विकास कामाला प्राधान्य दिले पाहिजे. एकवेळ नेता माझ्या घरातील लग्नकार्याला, वास्तूशांतीला किंवा दु:खद प्रसंगाला आला नाही तरी चालेल. परंतु, त्याने माझ्या भागाचे प्रलंबित प्रश्न सोडवलेच पहिजेत असा सकारात्मक विचार जनतेने केला तर पश्चिम भागाचे भविष्य बदलायला फार वेळ लागणार नाही.
– रवींद्र (आप्पा) भिलारे (अध्यक्ष, वाई तालुका कॉंग्रेस समिती)