बॅंक कर्मचाऱ्यांची पुन्हा मागणी
धर्मशाळा – देशात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असूनही मार्च महिन्यापासून देशातील बॅंका व्यवस्थित काम करीत आहेत. त्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका वाढला आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी बॅंकांच्या संघटनेने केली आहे.
अशाच प्रकारची मागणी ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशनने जानेवारी महिन्यात केली होती. मात्र, बॅंकर्सची संघटना असलेल्या इंडियन बॅंक असोसिएशनने ही मागणी योग्य नसल्याचे सांगितले होते. त्याऐवजी कर्मचाऱ्यांना 19 टक्के पगारवाढ देण्याचा प्रस्ताव बॅंकर्सनी पुढे केला होता. सध्या बॅंक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मिळते. त्याचबरोबर प्रत्येक रविवारी सुट्टी असते.
आता बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने म्हटले आहे की, पाच दिवसांचा आठवडा करण्याची गरज आहे. त्यामुळे बॅंकांचे कामही चालू राहील आणि कर्मचाऱ्यांच्या संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
जगात चार दिवसांचा आठवडा करण्याच्या शक्यतेवर विचार केला जात असताना भारतातील बॅंकांची संघटना मात्र पाच दिवसांच्या आठवड्यावर ठाम आहे. ऑल इंडिया स्टेट बॅंक ऑफिसर्स फेडरेशनचे अध्यक्ष दीपक शर्मा यांनी सांगितले की, जर पाच दिवसांचा आठवडा केला तर बॅंकांचे काम डिजिटल पद्धतीने वाढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
शाखांत सुविधांचा अभाव
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक शाखांतील पायाभूत सुविधा आधुनिक नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना उशिरापर्यंत काम करावे लागते. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. इतर आजारही होतात. त्यामुळे त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याची गरज आहे. रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही अनेकदा अधिकाऱ्यांना कामासाठी बोलावले जाते, असा आरोप शर्मा यांनी केला.